BJP VS Congress Sarkarnama
विदर्भ

BJP Vs Congress: चंद्रपूरचा बदला भिवंडीत? भाजपच्या मुनगंटीवारांनी काँग्रेसच्या दाव्यामधील हवाच काढली

Bhivandi And Chandrapur Mahapalika : भिवंडी महापालिकेत भाजपमधून आयात केलेल्या नगरसेवकाला काँग्रेसने महापौर केले. यामुळे त्यांनी आपल्याच निष्ठावान नगरसेवकांचे नुकसान केले आहे. हे जर काँग्रेस नेत्यांना समजत नसेल, तर देवच काय पण कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.

Rajesh Charpe

Nagpur News: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चंद्रपूर आणि भिवंडी या दोनच महापालिकांची चर्चा सुरू आहे. चंद्रपूरमध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने आपला महापौर बसवला, तर भिवंडीत भाजपच्या बंडखोराला काँग्रेसने महापौर केले. अशा परिस्थितीत 'आम्ही चंद्रपूरचा बदला भिवंडीत घेतला' असे दावे काँग्रेस नेत्यांमार्फत केले जात आहेत. मात्र, हे सर्व दावे हास्यास्पद असल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व चंद्रपूर महापालिकेचे 'किंगमेकर' सुधीर मुनगंटीवार यांनी "आमचा महापौर शुद्ध भाजपचा आहे" असा टोला काँग्रेसला लगावला.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "काँग्रेस नेत्यांच्या दाव्याचे मला आश्चर्य वाटते. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतच मला दोष दिसतो. चंद्रपूर आणि भिवंडी या दोन्ही महापालिकांमध्ये काँग्रेसचेच नुकसान झाले आहे.

भिवंडी महापालिकेत भाजपमधून आयात केलेल्या नगरसेवकाला काँग्रेसने महापौर केले. यामुळे त्यांनी आपल्याच निष्ठावान नगरसेवकांचे नुकसान केले आहे. हे जर काँग्रेस नेत्यांना समजत नसेल, तर देवच काय पण कोणीही त्यांना वाचवू शकत नाही. चंद्रपूरमध्ये आमचा महापौर 24 कॅरेट भाजपचा आहे, भिवंडीत तुमचा महापौर काँग्रेसचा आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसपेक्षा कमी नगरसेवक असतानाही भाजपने आपला महापौर एकमताने निवडून आणला. एवढेच नव्हे, तर अपक्ष निवडून आलेले काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवकही आपल्याकडे वळवले. हे सर्व 'ऑपरेशन' मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले, ज्यामुळे काँग्रेसला हात चोळत बसत रहावे लागले.

यावेळी त्यांनी वन्यजीव संघर्षावरही भाष्य केले. चंद्रपूर आणि गडचिरोलीच नव्हे, तर आता इतर शहरांमध्येही वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. यावर भाष्य करणे योग्य नसले तरी वाघांचे हल्ले थांबलेच पाहिजेत. मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढला असून याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसत आहे.

येत्या अधिवेशनात मी यावर आपली भूमिका मांडणार आहे. यासाठी 'एआय'ची (AI) मदत घेतली पाहिजे. मी काही महत्त्वाचे मुद्दे काढले असून त्यावर चर्चा करणार आहे. सध्या एआयचा ज्या पद्धतीने वापर व्हायला हवा, तसा होताना दिसत नाही. मानव व वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी एआयची मदत घेता येईल, अशी सूचनाही मुनगंटीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT