Chandrashekhar Bawankule & Abhishek Ghosalkar Sarkarnama
विदर्भ

Abhishek Ghosalkar Case : एकाच पक्षातील वादाला सरकार कसे जबाबदार?

Atul Mehere

Nagpur Politics : उद्धव ठाकरे गटाचे दोन लोक एकत्रित फेसबुक लाइव्ह करतात. त्यांचा जुना वाद असतो. त्यातील एक जण फेसबुक लाइव्ह सुरू असताना तेथे गोळीबार करतो. त्यावर विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा प्रकार पूर्णत: हास्यास्पद असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मुंबईतील अभिषेक घोसाळकर हत्याकांडाबाबत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात आला आहे. त्यावर बावनकुळे यांनी टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

बावनकुळे नागपुरात बोलताना म्हणाले की, खरेतर हा प्रकार एकाच घरातील भांडणासारखा आहे. घोसाळकर आणि मारेकऱ्याचा आपसातील हा वाद होता. त्यातून त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. एकाच वॉर्डातून दोघांना लढायचे होते. घोसाळकर आणि मारेकरी दोघेही एकाच पक्षातील आहे. खरे तर उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही. त्यातून त्यांच्या पक्षातील एका नेत्याची हत्या होते. परंतु आपले पाप झाकण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.

पोलिस या हत्याकांडाची चौकशी करीत आहेत. चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईलच असे ते म्हणाले. घटना सूर्य प्रकाशाप्रमाणे पारदर्शक आहे. दोघेही एकत्रितपणे फेसबुक लाइव्ह करीत होते. त्यामुळे कोणालाही किंवा पोलिसांनाही काय वाटेल, याचा अंदाज येऊ शकतो. हा काही गुन्हेगारीचा प्रकार नाही. आपसातील वादातून घडलेली ही घटना आहे, असे बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोसाळकर यांच्या हत्येचे समर्थन करता येणार नाही. परंतु त्यांच्या हत्येचे भांडवल करीत विरोधक जे रान पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तशा प्रकारचा हा गुन्हा नाही. त्यामुळे अशा घटनांसाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही. सरकार आपले काम करीत आहे. हत्याकांडाची चौकशी सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.

आपसातील वादातून झालेल्या घटना सरकार पुरस्कृत आहे असे म्हणताच येत नाही. संपूर्ण जगाने फेसबुक लाइव्ह पाहिले आहे. त्यातून समजूतदार लोकांना काय कळायचे ते कळले आहे. उगाच कांगावा कोण करत आहे, हे सर्वांच्या लक्षात येत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती जनतेला सत्य कळले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसींचा अपमान केला

संपूर्ण राज्यभरात राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला आहे. राहुल गांधी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्यामुळे संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला आहे. काँग्रेसने कधीही ओबीसीला आरक्षण दिले नाही. ओबीसी समाजातील जनता काँग्रेसला धडा शिकवेल.

ओबीसी नेते म्हणवून घेणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांनी आता या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. त्यांचेच नेते ओबीसींचा अपमान करीत आहेत आणि हे गप्प आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. इटलीत जन्म घेतलेले हे इटालियन पार्सल भारतातील ओबीसींचा अपमान करीत असल्याने त्यांना परत पॅक करून इटलीत पाठवून देण्याची वेळ आली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT