Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar : शरद पवारांच्या भाकरी फिरविण्यावर मुख्यमंत्री शिंदेंचे दिलखुलास उत्तर; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील युवा मंथन कार्यक्रमात भाकरी फिरविण्याची वेळ आल्याचे विधान केले. पवार म्हणाले, "संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल." शरद पवारांच्या वक्तव्यावरून नागपूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनीही दिलखुलास उत्तर दिले.

सध्या राज्यात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यात ठिकठिकाणी बॅनर लागले. तत्पुर्वी, स्वत: अजित पवार यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्या क्षमतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कौतुक केल्याचा दावा केला. त्यातच शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याची वेळ आल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

सध्या राज्यात बारसू रिफायनरीवरून राजकारण तापले आहे. तेथे पोलीस बळाचा वापर होत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्री आपल्या गावाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर गुरुवारी (ता. २७) ते नागपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना भाकरी फिरविण्यावरून, तसेच शरद पवारांनी केलेल्या फोनबाबत प्रश्न विचारले. त्यावर मुख्यमंत्री यांनी (Sharad Pawar) शरद पवारांच्या विधानावर मोकळेपणाने उत्तर दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे ते जे काही बोलले आहेत, त्याचा अर्थ त्यांनाच विचारला पाहिजे. ते जे काही बोलतात, त्याला अर्थ असतो. त्यांचे प्रत्येक विधान गांभिर्याने घेण्यासारखे असते. त्यामुळे भाकरी फिरविण्यावरून त्यांच्याशीच बोलून अर्थ समजून घ्यावा, तेच उचित ठरेल."

मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांशी बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून फोनवर चर्चा झाल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "शरद पवारांनी बारसू प्रकल्प भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय रेटू नका. त्यावर त्यांना आम्ही स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचे सांगितले. यापुर्वीही समृद्धी महामार्गाला विरोध झाला होता. मात्र गावोगावी जाऊन लोकांना विश्वासात घेतले. आता महामार्गामुळे किती फायदा होतोय हे आपण पाहतच आहे. तसेच बारसू येथील बहुतांश नागरिकांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहेत. आता माती परीक्षण सुरू आहे. त्याचा आहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT