Vijay Wadettiwar at Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Vijay Wadettiwar : सरकारच्या इभ्रतीचे वाभाडे निघत आहेत

Atul Mehere

Maharashtra Politics : सध्या राज्यात कोण कोणाला आव्हान देत आहे, हे कळेनासे झाले आहे. गृहखात्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणीतरी पत्र देतात आणि ते व्हायरल होतं. सरकारच्या उरल्या सुरल्या इभ्रतीचे वाभाडे काढण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

उपराजधानी नागपूर येथे शनिवारी (ता. २५) वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, राज्य सरकारमधील तीन नेत्यांची तोंडं तीन दिशेला आहेत. कुणाचेही कोणत्याच बाबतीत एकमत नाही. (Congress Leader Vijay Wadettiwar Criticized Government From Nagpur As They Have No Proper Communication In Between Them)

सरकारमध्ये 'कोल्ड वॉर’च्या पलीकडे जाऊन एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. तीन पक्षाचे सरकार तीन दिशेला तोंड करून आहेत. नेते एकमेकांची तोंडं पाहायला तयार नाहीत. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्यासमोर मोठं आव्हान आहे. या आव्हानाला गृह खातं आणि फडणवीस कसं तोंड देतात हे बघण्यासारखं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासनस्तरावरून दिलेल्या सूचनांचे पत्र व्हायरल झालं आहे. हे पत्र केव्हाचे आहे, त्यात अनके प्रश्न असतात, यासंदर्भात खुलासा होणे गरजेचे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवले आहे. आरक्षणसाठी मागासलेपणा सिद्ध करावे लागते. सर्वेक्षणात मागास ठरत नाही, तोपर्यंत कुणालाही आरक्षण देता येत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद टोकाला जायला नको होता. हा सरकार पुरस्कृत वाद आहे. जेजुरी लुटण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या पलीकडे आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

रात्रीच्या सभांमधून भानगडी वाढविण्यापेक्षा सरकारने सर्व समाजाच्या सभेला बंदी घालावी व आरक्षणाचा तिडा सोडवावा, असे वडेट्टीवार म्हणाले. धनगर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. ही घटना कार्यकर्त्यांचा उद्रेक होता. अंतरवालीची घटना झाली, तिथे जर एक भूमिका घेत असाल आणि ओबीसीसंदर्भात दुसरी भूमिका घेत असाल, तर समाज दुखावले जातील. त्यामुळे सर्वांना समान न्याय द्यावा, असे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जागेवर आता एकनाथ शिंदे यांना हिंदुहृदयसम्राट दाखविण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणी कोणाला काहीही संबोधले तरी जनता सर्वांना जागा दाखवेल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सरकारने या भानगडीपेक्षा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यावे. लोक शेती विकायला काढत आहेत, अवयव विकायला काढत आहेत ही दुर्दैवी बाब आहे. आपण सरकारला पत्र पाठवले आहे. केंद्राकडून मदत होणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी केली आहे.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT