Koradi Power Station & Vishal Muttemwar Nagpur Google
विदर्भ

Nagpur Congress : ‘एसओ-2’ नियंत्रणाशिवाय वीज प्रकल्पांचा विस्तार नको!

प्रसन्न जकाते

Thermal Power Station News : राज्यातील काही वीज प्रकल्पांचा विस्तार करण्याचा विचार शासन करीत आहे. अशात नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा व कोराडी या औष्णिक वीज प्रकल्पांचा सल्फर डायऑक्साइड (SO2) नियंत्रणाशिवाय विस्तार करण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं केली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. नागपुरात खारखेडा व कोराडी हे दोन वीज प्रकल्प आहेत. त्यापैकी कोराडीचा प्रकल्प राज्यातील सर्वांत मोठा औष्णिक वीज प्रकल्प आहे. (Congress Secretary General Of Maharashtra Vishal Muttemwar From Nagpur Demands Energy Minister Devendra Fadnavis To Control SO2 Level Of Thermal Power Stations In District)

कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा नागपूर शहर व परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्याशिवाय वीज प्रकल्पाचा विस्तार करू नये, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायर्नमेंटने (CSE) नुकत्याच केलेल्या अभ्यासात दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील वायुप्रदूषण वाढविण्यात कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प कारणीभूत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सीएसईच्या अहवालाचा आधार घेत मुत्तेमवार यांनी हे पत्र फडणवीस यांना पाठवलंय.

नागपूर जिल्ह्यात दोन औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. सद्य:स्थिती असलेल्या ऊर्जा प्रकल्पांना सल्फर डायऑक्साइड नियंत्रणाची गरज असल्याचं मुत्तेमवार यांनी म्हटलय. फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (FDG) हे ऊर्जा संयंत्राद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूंमधून सल्फर डायऑक्साइड काढून टाकण्यासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करण्यासंदर्भात शासनानं 2011 मध्ये आदेश काढले होते. शासन निर्णयानुसार ऊर्जा प्रकल्पांमध्ये एफडीजी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. परंतु याबाबत कोणत्याही उपाययोजनांचा वापर न करता नागपुरातील ऊर्जा प्रकल्प कार्यरत असल्याचं मुत्तेमवार म्हणाले. गेल्या 10 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऊर्जा प्रकल्पांच्या विस्ताराला विरोध नाही, परंतु नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ‘एसओ-2’चं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्यातही कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांमुळं हवेच्या गुणवत्तेवर अधिक परिणाम होतो. यासंदर्भात सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायर्नमेंटने दिलेल्या अभ्यास अहवालाच्या आधारावर नागपुरातील वीज प्रकल्पांमध्ये ‘एसओ-2’चं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उपाय करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याला भविष्यात धोका निर्माण होईल असा विकास घातकच ठरेल, असं मुत्तेमवार यांनी पत्रातून ऊर्जामंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT