Nana Patole News Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप भाजपने केले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

उत्तम कुटे

Nagpur News : कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. त्यात दहाव्या दिवशी विदर्भात भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील हल्लाबोल सुरूच ठेवला. भाजपने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे काम केले, अशी तोफ त्यांनी डागली. तसेच भाजपचा (BJP) अन्यायी, अत्याचारी कारभार घराघरात पोहचवा, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना यावेळी केले.

केंद्रात व राज्यातील भाजप सरकार सर्वसामान्य आणि गरिबांच्या हिताचे नाही, अशी टीका पटोलेंनी केली. काँग्रेस (Congress) सरकारच्या काळात रेशनवर गहू, तांदुळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते. पण, भाजपच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत असे त्यांचे मत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले. त्यांच्या मते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे, तो गरीब नाही. म्हणून त्यांचे रेशनवरील डाळ, तेल, साखर, तांदूळ बंद करुन टाकले आणि गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले, असा हल्लाबोल त्यांनी चढवला.

भाजप सरकार शेतकरी विरोधी, व्यापारी विरोधी, गरिबविरोधी असल्याचे पटोले म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकतो, तेव्हा डाळीला भाव नसतो. हीच डाळ अदानीच्या गोडाऊनमध्ये गेली की १७० रुपये किलो होते. दुकानात कोणतीही वस्तू खरेदी करा, त्यावर आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. राज्यातील हिटलर सरकार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही, तर कनेक्शन तोडते. उन्हाळी धानाचे पैसे अजून मिळाले नाहीत. आठ दिवसात पैसे देण्याचा नियम असूनही सरकारने तीन-चार महिने झाले, तरी सरकारने ते दिलेले नाहीत. गरजेच्या वेळी ते शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, तर त्याचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी केला.

खतांच्या किमती दुप्पट केल्या, मात्र त्याचे पोते पन्नास किलोवरून ४५ किलोपर्यंत कमी केले. तसेच खतांची लिंकिग करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतीला लागणारा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तर त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि कार खरेदी करायची असेल, तर तो १२ टक्के या विरोधाभासाकडे पटोलेंनी लक्ष वेधले. भाजप सरकार आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून मरण स्वस्त झाले आहे, अशी तोफ त्यांनी डागली. तसेच ही यात्रा सत्तेसाठी नाही तर लोकशाही, संविधान व देश वाचवण्याकरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT