D. Raja Nitin Gadkari  sarkarnama
विदर्भ

D Raja : डाव्या नेत्याची नितीन गडकरींवर स्तुतीसुमने, मोदी, शहांना म्हणाले...

Rajesh Charpe

D Raja News : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची प्रशंसा विरोधकही करतात. सर्वच पक्षात त्यांचे समर्थक आहेत. सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी त्यांची संसदेत स्तुती केली होती. एरवी भाजपपासून नेहमीच फटकून वागणाऱ्या डाव्या पक्षांच्या नेत्यांना देखील गडकरींनी भुरळ घातली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा म्हणाले की, गडकरी हे चांगले व्यक्ती आहेत. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे देश सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे.

डी राजा हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची सभेसाठी नागपूरला आले होते. डी राजा म्हणाले, देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारानुसार काम करतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची छबी आक्रमक नेते अशी आहे. भाजपचे काही नेते संविधानापेक्षा गीता हा धार्मिक ग्रंथ श्रेष्ठ मानतात. हे चुकीचे आहे.

नितीन गडकरी आरएसएस विचाराचे असले तरी मोदी, शहांच्या तुलनेत सौम्य आहेत. ते भाकपचे नेते ए. बी. बर्धन यांचा आदर करीत होते. त्यामुळेच देशात पहिल्यांदा भाजप सत्तेवर आल्यावर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते भाकप कार्यालयात ए. बी. बर्धन यांच्या भेटीला आले होते अशी आठवण राजा यांनी सांगितली.

गडकरींनी संसदेत वैद्यकीय विमासह इतरही काही विषयांवर सकारात्मक भूमिका मांडली असली तरी मोदी-शाह यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देशाला चुकीच्या वाटेवर नेत आहे. या नेत्यांना देश- विदेशात फिरायला वेळ आहे. परंतु देशातील मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून पेटत असताना तेथे जायला वेळ नसल्याचीही टीका डी. राजा यांनी केली

भाजप सरकार अपयशी

भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह विविध स्वप्न दाखवत सत्ता मिळवली. परंतु आता या आश्वासनांचे काय झाले? हे पुढे येत आहे. सध्या तरुणांच्या हाती काम नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते हवालदील आहे. देशात महिला अत्याचार वाढत असून कामाच्या ठिकाणीही महिला सुरक्षित नाही. देशात सर्वत्र दलित, आदिवासींवरील गुन्हे वाढत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार पूर्णपणे अपयशी असल्याचा आरोपही डी. राजा यांनी केला.

एक देश, एक निवडणूक हे धोरण अव्यवहार आहे. संविधानाने निवडणूक आयोग स्थापन केले असून त्यांना निष्पक्ष निवडणूक घेण्याचे अधिकार आहे. त्यानुसार निवडणूक आयोग विविध निवडणूक घेत असते. एक देश, एक निवडणुकीमुळे या निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होऊन देश हुकूमशाहीकडे जाण्याचा धोका आहे, असल्याचे डी. राजा यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT