Farmer's Protest in Akola Sarkarnama
विदर्भ

Akola Farmer's Protest : युती सरकारची घोषणा ठरली फोल; सहा वर्षांनी प्रमाणपत्र परत करत शेतकऱ्यांनी केली पोलखोल

जयेश विनायकराव गावंडे

Another Agitation : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं उपोषण सुटल्यानंतर काही तास होत नाही तोच आणखी एका आंदोलनानं अकोला जिल्हावासीयांचं लक्ष वेधलय. राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार असताना २०१७ मध्ये करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभच न मिळाल्यानं सहा वर्षांनंतर शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची प्रमाणपत्र प्रशासनाला परत केलीय. प्रमाणपत्रासोबत साडीचोळीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.

धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) हे आंदोलन करण्यात आल्यानं उत्सवाच्या काळातही अधिकाऱ्यांचे चेहरे पडल्याचं बघायला मिळालं. शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. (Farmer's in Akola Protested against BJP Shivsena Alliance government for not giving benefits of Loan Waiver Scheme Declared in 2017)

राज्य सरकारनं २८ जून २०१७ मध्ये कर्जमाफीसाठी ही योजना जाहीर केली होती. त्यावेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र, अकोला जिल्ह्यातील लाखो लाभार्थी अद्यापही या योजनेपासून वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. गेल्या सहा वर्षांपासून राज्यातील ६ लाख ५६ हजार शेतकरी तर अकोला जिल्ह्यातील १३ हजार ३४ शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं या शेतकऱ्यांनी शुक्रवारी आंदोलनात्मक भूमिका घेतली.

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजप नेते तथा अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्याच दिवशी १८ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं होतं. त्यावेळी शेतकरी जोडप्यांचा कपडे व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यानंतरही सहा वर्षांत कर्जमाफी न मिळाल्यानं त्याच चार शेतकऱ्यांनी प्रमाणपत्र, शासनानं दिलेल्या कपड्यांचे फाटके तुकडे, साडीचोळी जिल्हाधिकाऱ्यांना परत केले. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी या वेळी खडे बोल सुनावले. सरकारनं कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची थट्टा केली. मंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करून मोठेपण दिलं, पण खरी मदत मात्र केलीच नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गाठला. या वेळी त्यांनी योजनेत पात्र असूनही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडी हा विषय लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आदी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT