Nagpur News, 19 May : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रोटोकॉलवरून नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणे सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या गवई यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार एकही सक्षम अधिकारी उपस्थित नव्हता.
याचा उल्लेख गवई यांनी स्वतःच केला आणि संबंधितांना तंबीही दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून नेली. मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना व अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे भूषण गवई महाराष्ट्राचे आहेत. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपिठात त्यांनी काम केलं आहे. सध्या सरन्यायाधीश या सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी न्यायाधीश म्हणून घेतले आहेत.
त्यांचा आदर सत्कार करणे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून राज्य सरकारची विशेष जबाबदारी असताना त्यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार एकही अधिकारी विमानतळावर गेला नाही. स्वतः सरन्यायाधीश गवई यांनीच आपल्या भाषणातून त्याचा उल्लेख केला.
त्यांनी प्रोटोकॉलनुसार कुठल्या कलमाखाली कार्यवाही करता येते हे सुद्धा सांगून टाकले. इतक्या चिल्लर गोष्टीचा आपणास बाऊ करायचा नाही. मात्र कोणी मुद्दाम असे करीत असेल तर आपण काय करू शकतो, असाही इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर सरकारी अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी लगेच माफी मागितली. यावर वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही?
याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का? ही कोणाची चूक आहे हेसुद्धा स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राचा सुपुत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी पोहचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो ही अत्यंत वाईट घटना असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.