Vidarbha Neglect Nagpur News : हिवाळी अधिवेशनात सरकारकडून विदर्भाला न्याय दिला जाईल, शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जाईल, संत्रा, कापूस, धान उत्पादकांना दिलासा दिला जाईल या अपेक्षा होत्या. मात्र त्या फोल ठरल्या. फक्त 75 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यासाठी अधिवेशन घेण्यात आले. सरकारने विदर्भाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचे सर्व लक्ष महापालिकेच्या निवडणुकीकडे होते, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी आज केला.
हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेले भाषण नागपूरच्या अधिवेशनात वाचून दाखवले असल्याचा टोला विरोधकांनी लगावला.
आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. तर सर्व जुन्याच योजनांचा पाढा वाचला. कोट्यवधींचे प्रकल्प आणि त्याचे आकडे सांगितले. या आकड्यांची गोळाबेरीज केल्यास ती देशाच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
भास्कर जाधव म्हणाले, सरकारने पंधरा ते वीस निवेदने स्वीकारली. मात्र त्यामध्ये एकही विदर्भाचे नव्हते. मुंबई आणि इतर महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करण्यात आल्या. सर्वाधिक घोषणा या मुंबईच्या होत्या. किमान या अधिवेशनात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले जाईल असे आम्हाला वाटत होते. या सरकारने विदर्भ वासीयांना फसवून त्यांना गृहीत धरले असल्याचे दिसून येत आहे. असेही भास्कर जाधव म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही धानाला बोनस मागितला तोही दिला नाही. संत्रा, कापूस आणि मोसंबीचा उल्लेखही सरकारने केला नाही. ज्या घोषणा केल्या त्या फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या. हे अधिवेशन फक्त ‘जुमला‘ असल्याचा आरोप त्यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, या सरकारने दावोसमध्ये झालेल्या कराराची आकडेवारी वाचून दाखवली.
प्रत्यक्षात विदर्भात किती कोटींची गुंतवणूक झाली, किती उद्योगधंदे सुरू झाले आणि किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला हे मात्र सांगितले नाही. मीसुद्धा उद्योग विभागामार्फत माहिती मागितील होती. त्यांनीसुद्धा कराराच्या वेळी जाहीर केलेले आकडेच दिले. करार करणे म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक होत नाही असे सांगून जयंत पाटील हे सरकारने कागदोपत्री माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.