Mahayuti News: विश्वासात न घेता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत राळेगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर केलेल्या ८१ कामांना स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातचे पत्र जिल्ह्यात धडकले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, सत्ताधारी महायुतीतील मंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्यामध्ये शितयुद्ध रंगल्याची चर्चा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे विशेष बाब म्हणून करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २६६ कामांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला होता. तद्वंतर विशेष बाब म्हणून कामांना मंजुरीसुद्धा देण्यात आली होती. यातील २३५ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कामांची वर्क ऑर्डर काढण्यात आली असून, प्रत्यक्षात कामालासुद्धा सुरवात झाली आहे.
यात प्रामुख्याने राळेगाव विधानसभा मतदार संघात ८१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित कामांमध्ये कळंब ३२, केळापूर तीन, राळेगाव ११, तर बाभूळगाव ३५ आदींचा समावेश आहे. परंतु, ही कामे प्रस्तावित करण्यापूर्वी स्थानिक आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, विश्वासात न घेता ह्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, प्रत्यक्षात कामांना सुरवातसुद्धा झाली आहे.
या प्रकारामुळे भाजप पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सर्वांनी मंत्री अशोक उईके यांच्यासमोर गारहाणे मांडले होते. या प्रकारानंतर मंत्र्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. विश्वासात न घेता अतिघाईने कामे मंजूर केली. नियोजन शून्य कामे असल्याचा ठपका ठेवत ८१ कामे रद्द करून नव्याने कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करावी, असा उल्लेख पत्रात केला होता.
त्यावरून मंजूर असलेल्या ८१ कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तर मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या शिफारसीने सुचविलेले कामे प्रस्तावित करावी, असे आदेशात नमूद केले आहे. या प्रकारामुळे पुन्हा पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्यामधील शितयुद्धा रंगल्याची चर्चा स्पष्ट दिसून येत आहे.
सुरू झालेली कामे 'गोत्यात'
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत राळेगाव विधानसभा मतदार संघात कळंब तालुक्यात ३२, केळापूर तीन, राळेगाव ११, तर बाभूळगाव तालुक्यात ३५ असे मिळून ८१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील काही कामांना सुरवात झाली आहे. सुरू झालेली कामे गुणनियंत्रण, त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करावी, असे पत्र आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांना दिले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीला सुरवात केली आहे. या पत्रामुळे सुरू झालेली कामे चांगलीच गोत्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
इतरही लोकप्रतिनिधी पत्र देण्याच्या तयारीत
जिल्ह्यातील इतरही विधानसभा मतदार संघात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्षात कामांना सुरवातसुद्धा झाली आहे. परंतु, त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांना विश्वासात घेतले नसल्याचा विषय पुढे आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील इतरही आमदार प्रस्तावित कामांना विरोध करण्याच्या तयारीत असून, शासनस्तरावर पत्र पाठविणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.