Nagpur, 01 September : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारवर मोठा दबाव वाढवला आहे. त्यांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, तीन दिवस उलटून गेल्यानंतरही ते मागे हटण्यास तयार नाहीत. त्यांनी यापूर्वी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीपासून त्यांनी आता ‘यू टर्न’ घेतला असल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला आहे. ज्यांच्या गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, असेही तायवाडे यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी केला आहे. त्साठी ते मुंबईत आंदोलन करीत आहेत. आंदोलनापासून ते मागे हटायला तयार नाहीत, त्यामुळे सरकारही पेचात सापडले आहे. जरांगे पाटील यांच्या सरकटच्या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. त्यावरून दोन्ही समाजात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत.
जरांगे पाटील यांच्या दबावाला सरकारने बळी पडू नये, याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस होता.
यावेळी तायवाडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीपासून ‘यू टर्न’ घेतला आहे. त्यांनी यापूर्वी सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, आता ते मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे. गॅझेटमध्ये तसेच शैक्षणिक, महसूल कागदावर नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे यांची ही मागणी यापूर्वीच सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार नोंदी शोधल्या जात आहेत. हैदराबाद गॅझेटच्याही नोंदी शोधल्या जात असल्याचे तायवाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा जरांगे यांच्या सरसकट मागणीला आम्ही विरोधच केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला त्यावेळी आश्वस्त केले होते. ओबीसींवर अन्याय केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांंनी दिले आहे.
महायुती सरकारवर जरांगे यांचा दबाव वाढत असल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र, नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचे आपल्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू असल्याने जाणे शक्य झाले नाही. याची कल्पना फोन करून छगन भुजबळ यांना देण्यात आली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेले आंदोलन सोडून येता येणार नसल्याचे भुजबळ यांना कळविले असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.