Govil Meharkure, Suryakant Khanke and Others Sarkarnama
विदर्भ

Maratha Vs OBC Community : मराठा-ओबीसी वाद; हा फक्त राजकीय खेळ, दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी !

प्रमोद काकडे

Chandrapur Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांचा तो अधिकार आहे. मात्र ते ओबीसी मधूनच आरक्षणासाठी आग्रही आहेत. मराठा आणि ओबीसीमध्ये जाणीवपूर्वक भांडण लावले जात आहे. यामागे राजकीय खेळीसुद्धा असू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप विदर्भ तेली महासंघांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. (They want reservation from OBCs in any case)

विदर्भ तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे, शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, प्रा. संजय बेले यांनी आज (ता. १२) ‘सकाळ संवाद’मध्ये सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर मत व्यक्त केले. कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मराठा समाज मागत आहे. याचा अर्थच त्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. याचा परिणाम कुणबी समाजासह ओबीसीत समाविष्ट सर्व जातींवर होईल.

आधीच ओबीसींची जनगणना झाली नाही. २७ ऐवजी ओबीसींना १९ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाची भर पडली, तर ओबीसी प्रवर्गात आधीच समाविष्ट असलेल्या जातींचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे. मराठासुद्धा बहुजनच आहे. ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरु, असे खनके म्हणाले.

मेहरकुरे म्हणाले, कुणबी ओबीसींचा घटक आहे. तुकाराम आणि संताजी नाते अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. १७ सप्टेंबरच्या मोर्चात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. परंतु मराठा-ओबीसी हा वाद दुर्दैवी आहे, तो थांबला पाहिजे. धोरणकर्त्यांनी यावर त्वरित तोडगा शोधावा. अन्यथा सामाजिक घडी विस्कटून जाईल. याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील.

अमृतकर यांनी यावेळी वेगळाच मुद्द्याकडे लक्ष वेधले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) भूमिकेमागे आपण वेगळ्या पद्धतीने बघितले पाहिजे. त्यांना राजकीय (Political) आरक्षणाची गरज आहे. उद्या जातिनिहाय जनगणना झाली आणि ओबीसींचा (OBC) टक्का वाढला. त्यावेळी राजकीय आरक्षण नसलेल्या मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. हीच भिती त्यांना आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे.

हा प्रश्न कितीही आयोग बसले तरी सुटणार नाही. जातिनिहाय जनगणना हाच यावर एकमेव उपाय आहे. कुणाची संख्या किती, हे एकदा निश्चित झाले की आरक्षण त्याप्रमाणे निश्चित करता येईल, असे अमृतकर म्हणाले. खनके यांना मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन करताना काही संशयसुद्धा व्यक्त केले. लोकसभा निवडणूक सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांसारखे ज्वलंत प्रश्न आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी आतापर्यंत अनेक षड्यंत्र रचण्यात आले. हिंदू-मुस्लिम दंगलीसुद्धा पेटविण्यात आल्या. मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद त्याच श्रृंखलेतील आहे. मात्र आता दोन्ही समाजांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. आपला वापर मतपेढीसाठी नको तर आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झाला पाहिजे, असे आवाहन खनके यांनी केले.

यानिमित्ताने ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दोन्ही समाज सामंजस्याची भूमिका घेऊन आहे. भविष्यातसुद्धा घेतील. त्यामुळे हे षड्यंत्र हाणून पाडू. मराठ्यांना आरक्षण द्या. ते ओबीसीतून नको, एवढीच आमची मागणी आहे, असेही प्रा. खनके म्हणाले.

राज्य सरकारने यावर विशेष अधिवेशन बोलवून यावर तोडगा काढावा. कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला दिले म्हणजे आरक्षण मिळाले असे होत नाही. त्यासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचा पुरावासुद्धा आणवा लागेल. शासनानेसुध्दा मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी, असे गोपाल अमृतकर यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT