Chandrakant Patil-Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati DPC Fund : चंद्रकांतदादांना वेळ मिळेना, 158 कोटींचा निधी माघारी जाण्याची भीती; बच्चू कडूंची पाटलांवर टीका

Vijaykumar Dudhale

Amravati, 14 July : महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे प्रहार संघटनेचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या सरकारमधील मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून बच्चू कडू यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टार्गेट केले आहे.

अमरावती (Amravati) जिल्हा नियोजन समितीची (DPC) शेवटची बैठक जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अमरावती जिल्हा नियोजन समितीची एकही बैठक झाली नाही. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी 158 कोटी रुपयांचा निधी अमरावती जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसल्याने विकास कामांवर हा निधी खर्च झाला नसल्याची बाब पुढे आली आहे.

अमरावतीचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता. त्यानंतर झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन, यामुळे अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक जानेवारीपासून होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेला तब्बल 158 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांच्या संमतीअभावी खर्च करता येत नाही. त्यामुळे निधी उपलबध असूनही अमरावतीकरांसाठी तो खर्च करता येत नसल्याची परिस्थिती आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमी अमरावती जिल्ह्यात येत नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या संमतीशिवाय हा निधी खर्च करता येत नाही. तसेच सरकारचा कालवधीही अवघा दोन महिनेचे राहिला आहे. त्यामुळे हा निधी अमरावतीमध्ये खर्च होणार की परत जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सुमारे 158 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व्हावी लागणार आहे. त्यात कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा आणि खर्च करण्याची मर्यादा असणार याचे नियोजन होते, त्यानंतर हा निधी खर्च करता येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

या संदर्भात माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पालकमंत्री जिल्ह्यातील नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायचे असेल तर एक तर पुण्याला किंवा कोल्हापूरला जावं लागते. इथंच महायुतीने मार खाल्ला, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT