Bachchu Kadu, Devendra Fadnavis  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu: बच्चू कडूंनी भाजपविरोधात थोपटले दंड; आमचं अस्तित्व स्वतंत्र...!

Mangesh Mahale

Amravati : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने एन्ट्री केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातही 'प्रहार'ने भाजपविरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आक्रमक आमदार अशी ओळख असलेले बच्चू कडूंनी भाजपच्या विरोधात दंड थोपटल्याने भाजप काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भैसदेही विधानसभा मतदारसंघात 'प्रहार'कडून राहुल चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल उपस्थित होते.

मध्य प्रदेशात उमेदवार दिल्याने उत्तर प्रदेशात तीन उमेदवार देणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. "आम्ही कोणत्याही पार्टीचे गुलाम नाही,आमचा पक्ष स्वतंत्र आहे,आमचं अस्तित्व स्वतंत्र आहे, आम्ही महाराष्ट्रात पाठिंबा दिला म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशामध्ये पाठिंबा द्यावा असे नाही," असे कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप सोबत तडजोड होऊ शकते, पण त्यांनी प्रस्तावच ठेवला नाही, आम्हाला बैठकीला बोलावणार आणि जागा काहीच देणार नाही, मग त्या बैठकीला काय अर्थ? असा प्रश्न कडूंनी उपस्थित केला आहे. "प्रहारचा जेवढा मतदार आहे, जेवढी संख्या आहे, तेवढा आम्हाला वाटा दिला पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बच्चू कडू यांनी २ जानेवारीच्या तारखेबाबत एक मोठी भीती व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. कालच्या यशस्वी मध्यस्थीचं यश हे जरांगे पाटील आणि मराठ्यांचं आहे. माझा एक कार्यकर्ता म्हणून रोल होता, असं बच्चू कडू म्हणाले. जरांगे पाटील यांनी दिलेल्या २ जानेवारीच्या मुदतीवरही बच्चू कडू म्हणाले, "आता जो तारखेचा घोळ होत आहे, तो मी तारीख जाहीर करताना जरांगे पाटलांशी बोललो होतो. तीन महिने वेळ द्या, असं मी सांगत होतो; पण आता लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे,"

जरांगे पाटील हे २४ डिसेंबरची तारीख म्हणत आहेत. सरकार दोन जानेवारी म्हणत आहे. मात्र, या काळात दिवाळीच्या आठ ते दहा दिवस सुट्ट्या जात आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होईल. यामुळे राज्य सरकारने २४ तारीख समजूनच काम केलं पाहिजे, तर ते लगेच होईल, असं बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT