Kanhaiya Kumar Sarkarnama
विदर्भ

Kanhaiya Kumar : ''...त्यामुळे आता मोदींनी महाराष्ट्रात 450 रुपयांत सिलिंडर द्यावं'' ; कन्हैया कुमारांची मागणी!

Amar Ghatare

अमर घटारे -

Amravati News : ''पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचारशे रुपयात सिलिंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं, आता मोदींनीही आश्वासन पूर्ण करावं.'' अशी मागणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे.

तसेच, ''चार राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपयश आले असेल तरी, काँग्रेस लोक कल्याणासाठी काम करत राहील. या देशात कोणत्याही व्यक्ती किंवा पार्टीच्या बाजूने हवा नाही. देशात घटनात्मक लोकशाही हवी असेल, तर काँग्रेससोबत जुळणे आवश्यक आहे.'' असं देखील कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) म्हणाले आहेत.

अमरावती येथे बुधवारी (ता. 6) काँग्रेसच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाची अभिवादन रॅली अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे आयोजित करण्यात आली होती, यावेळी कन्हैया कुमार बोलत होते.

देशातील मोदी सरकार केवळ जुमलेबाज आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. गुजरात, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. आता त्यांनी किमान या राज्यात तरी आपले आश्वासन पूर्ण करावं, असं कन्हैया कुमार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातही 450 रुपयांना सिलिंडर द्यावे -

''काँग्रेसला जे लोक मतदान करत नाहीत त्यांना विचारले तरी ते देखील हेच सांगतील की, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. लोकशाही टिकवून ठेवली, सामान्य माणसाला रोजी आणि रोजगार दिला. सरकारी नोकऱ्या काँग्रेसनेच दिल्या. काँग्रेस म्हणजे लोककल्याण करणारी पार्टी असे या पक्षाची सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रतिमा झालेली आहे.'' असं कन्हैया कुमार म्हणाले.

याचबरोबर ''काँग्रेस पक्ष आपली हिच प्रतिमा घेऊन सामान्य माणसात जाऊन काम करणार आहे.आपला देखील तोच प्रयत्न असेल. तीन राज्यात काँग्रेसला सत्ता मिळाली नसली तरी आम्ही हरलेलो नाही. आमच्यात निराशा असली तरी आम्ही महिला, युवक, शेतकरी सर्व आघाड्यांवर नव्या दमाने कामाला लागू.'' असा आशावाद काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी व्यक्त केला.

तसेच ''काँग्रेस नेते राहुल गांधी सामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातून लोकांचा अद्यापही काँग्रेसवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं.'' असं कन्हैया कुमार म्हणाले.

याचबरोबर ''भाजपच्यावतीने देशभरामध्ये जातीय विष पेरण्याचे काम होत आहे. भाजपच्या या कृतीमुळे देशभरातील वेगवेगळ्या जाती,धर्मांमध्ये तेढ निर्माण होत आहे. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप कोणत्या स्तराला जाऊ शकते. त्यांना देशाच्या एकात्मतेची काहीही देणंघेणं नाही.'' असा आरोपही कन्हैया कुमार यांनी केला.

''चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं नसलं तरी, येथे झालेल्या चुकांवर तातडीने काम सुरू झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला नक्कीच यश मिळेल.'', असा दावाही कन्हैया कुमार यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT