Nitesh Rane. Sarkarnama
विदर्भ

Nitesh Rane : महाराष्ट्रात टीपू सुलतानचे उदात्तीकरण कदापी खपवून घेणार नाही

प्रसन्न जकाते

Nitesh Rane : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून टीपू सुलतानचे उदात्तीकरण सुरू आहे. टीपू सुलतान कोण होता हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मायभूमीत टीपूचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी ठणकावून सांगितले. राणे रविवारी (ता. 18) अकोला जिल्ह्यात दौऱ्यावर होते. अकोल्याला जाण्यापूर्वी त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध आणि टीपू सुलतानचा उदाउदो करणाऱ्यांना इशारा दिला.

अकोल्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा आहे. अकोल्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत. गेल्या काही दिवसात अशा घटना वाढल्या आहेत. टीपू सुलतानचे उदात्तीकरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध होत आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात कोणी पुतळा बसविण्याला विरोध करूच कसा शकतो, असा सवाल त्यांनी केला. आता सकल हिंदू समाजाला जागृत करण्याची वेळ आली आहे. सगळ्या हिंदुत्ववादी संघटना एकवटणार असल्याचे राणे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुस्लिम समाजाला किंवा धर्माच्या आधारावर आरक्षण कोणालाही मिळू शकत नाही. ही बाब कोर्टाने स्पष्ट केली आहे. मुस्लिम आरक्षण विषयाचा विचार केला तर या समाजात असंख्य जाती आहेत. त्या जातींचा अभ्यास करून जर आरक्षण मागितले तर ते शक्य आहे. मुस्लिम धर्म म्हणून मुस्लिम या नावाने आरक्षण मिळू शकत नाही. ते कायद्यात बसणारे नाही. चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या मागण्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. अशा चुकीच्या मागण्यांची दखल सरकार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धाही भूमिका सभागृहात मांडली आहे. उगाच लांगूलचालन कोणी करू नये, असे नीतेश राणे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेसारखा खोटारडा माणूस महाराष्ट्रात नाही. हा खोटारडेपणा जनता ओळखते. उद्धव ठाकरे यांच्यासारखेच खोटारडे माणूस संजय राऊत आहेत. अमित शाह यांची बैठक झाली, त्यावेळी मातोश्रीत संजय राऊत तेथे होते का, असा सवालही राणे यांनी केली. उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखे बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. संजय राऊतांच्या शब्दाला महाराष्ट्र सोडा, त्यांच्या घरात तरी मान आहे का, असा सवाल नीतेश राणे यांनी केला. बहुजन समाज म्हणून किंवा हिंदू म्हणून कोणीही आपसात लढू नये अशीच भूमिका असली पाहिजे. हिंदू समाजाचे फार मोठे नुकसान या लढ्यातून होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना आवाहन आहे की, हिंदू आपसात लढतील तर त्याचा फायदा जिहाद्यांना होईल, असे आवाहन राणे यांनी केले.

‘आबकी बार 400 पार’ हा जो नारा नरेंद्र मोदींनी दिला आहे, त्यानुसार निकालात प्रतिबिंब दिसेल. आजघडीला पूर्ण देश मोदींच्या सोबत आहे. प्रत्येक वर्गाला मोदींची गॅरंटी चालते. देशभरातील काँग्रेस नेत्यांनाही आता हे समजले आहे. राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’चा माल संपलेलला आहे. ती नफ्याची दुकान राहिलेली नाही. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत लोक आता शिल्लक नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांना आपले भविष्य मोदींच्या गॅरंटीमध्ये दिसत आहे, असेही नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT