Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

Nitin Raut : 'दीड हजार दिले ताई, आता काही मागू नको'; नितीन राऊतांची झोंबणारी कविता

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेले उपाहासात्मक कविता ट्विट केलं आहे. या काव्यातून महायुती सरकारला चांगलेच चिमटे काढलेत. नितीन राऊत यांनी रक्षाबंधन सणाच्या टायमिंगवर ही कविता समाज माध्यमांवर शेअर केली आहे. त्यामुळे ती कविता वेगाने व्हायरल होत आहे.

महायुती सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेण्यासाठी राज्य दौऱ्यावर आहेत. यातच नितीन राऊतांनी ही कविता केल्यानं आणि टायमिंग साधल्यानं ते सरकारला झोंबणार, अशी राजकीय चर्चा आहे.

नितीन राऊत काँग्रेसचे (Congress) नेते असून, ते महायुती सरकारवर नेहमीच हल्ला चढवतात. या कवितेतून देखील त्यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. 'दीड हजार दिले ताई, आता काही मागू नको', असे हे उपाहासात्मक काव्य आहे. सरकारच्या विविध योजना आणि त्यातून चाललेली लूट, आणि त्यावर मार्मिक टिप्पणी या कवितेतून करण्यात आली आहे. त्यामुळे कवितेतील प्रत्येक उपाहासात्मक वाक्य सरकारला झोंबणारं असंच आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख नेते लाडकी बहीण योजनेच्या प्रचारात गुंतले आहे. याचबरोबर सरकारी यंत्रणा देखील त्यावर काम करत आहे. या योजनेतून राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिलांना पैसे देखील बँक खात्यावर वर्ग झाले आहेत. त्यामुळे या योजनेचा महिलांमध्ये चर्चा आहेत. तसंच या योजनेवर समाज माध्यमांवर मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

महायुती सरकारच्या या योजनेवर महाविकास आघाडीकडून कुरघोडीचा प्रयत्न होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर दुप्पट रक्कम महिलांच्या खात्यावर दर महिन्याला देऊ, असं म्हणत आहे. त्यामुळे या योजनेवरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. महायुतीमधील सत्ताधारी विरोधकांवर या योजनेवरून टीका करत आहे, तर महाविकास आघाडी देखील महायुती सरकारवर प्रहार करत आहेत. यातच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी या योजनेवर उपाहासात्मक केलेली कविता समोर आली आहे.

अशी आहे कविता...

नसेल नोकरी, तुझ्या लेकाला, नवरा कोठेही राबत असेल, फाटक्या तुझ्या संसारात, आशा काही जागत नसेल, विसरून जा नोकरी-बिकरी, आमच्यावर राग नको, दीड हजार दिले ताई, आता काही मागू नको.

फुटक सिलिंडर दिले तुला, धान्यसुद्धा फुकट दिले, तेल-मीठ-मिरचीला दीड हजार रोख दिले, उगीच आता हट्ट करत, माझ्या मागे लागू नको, दीड हजार दिले ताई आता काही मागू नको.

धुणी-भांडी करत फिरतेस, पावसात झोपडी गळते आहे, दिवसरात्र राबराबून काय पदरात पडते आहे, निवडून आल्यावर सारे मिळेल, स्वप्न बघत जागू नकोस, दीड हजार दिले ताई आता काही मागू नको.

स्वावलंबी व्हायला, उद्योगासाठी कर्ज मागायला आलीस, कर्ज तुला कोठून देऊ, तिजोरी सारी खाली झाली, जागतिक मंदी ताई-बाई, उद्योगाच्या मागे लागू नको, दीड हजार दिले ताई आता काही मागू नको.

दारूडा नवरा तुला मारायला रोज पिऊन येत आहे, त्यात दारूच्या करातून ताई, योजना तुला देतो आहे, दारूबंदी अगं ताई आता काही होणार नाही, कळतंय मला संसार तुझा धडपणे होणार नाही, अडचण आमची समजून घे, दारूबंदीसाठी मागे लागू नको, दीड हजार दिले ताई आता काही मागू नको.

फक्त ताई फॉर्म भर, दीड हजार घरपोच येतील, पुन्हा आमचे सरकार निवड, प्रश्न सारे संपून जातील, सारखे-सारखे प्रश्न विचारून विरोधी पक्षासारखी रागवू नको, दीड हजार रुपये दिले ताई, आता काही मागू नको.

(ही मूळ कविता हेरंब कुलकर्णी यांची आहे.)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT