काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या डावपेचामुळे नागपूर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात मोठा असंतोष उफाळून आला आहे. वाडी नगर पालिकेत पक्षाच्या लोकांना डावलून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी एबी फॉर्म दिल्याने सुमारे दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना पठ्ठ्याने अर्जासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.) या दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म जोडले आहेत.
वाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रेम झाडे यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. ते राष्ट्रवादीचे आणि माजी नगराध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे अनेक इच्छुक असताना केदारांनी झाडे यांना एबी फॉर्म दिल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. झाडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी कारवाई केली होती. त्यांच्या घरी दोन लाख रुपये पोलिसांना सापडले होते.
नागपूर जिल्ह्यात नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत घमासान सुरू आहे. सर्वाधिक असंतोष काँग्रेसमध्ये उफाळून आला आहे. केदारांनी या वादाला सुरुवात केली. त्यांनी फक्त आपच्याच समर्थकांच्या मुलाखती घेतल्या. याची तक्रार झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केदारांच्या पुढाकाराने बोलावले बैठक अवैध ठरवली. दुसऱ्या दिवशी नव्याने मुलाखती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केदारांचे समर्थक जिल्हाध्यक्ष आश्विन बैस यांनी मुलाखतीचे सर्व सोपस्कार पाळले.
निवड समितीच्या सदस्यांनाही आमंत्रित केले. त्यानंतर सर्व अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्यात आला. मात्र केदारांचे वर्चस्व असल्याने प्रदेशाध्यक्षांनीसुद्धा काहीच हस्तक्षेप केला नाही. पक्षाची अधिकृत यादी जाहीर केली नाही. फक्त शक्य तिथे आघाडी करून लढण्याचे सुचवण्यात आला. काटेकोर व स्पष्ट सूचना नसल्याने याचा फायदा प्रत्येकाने आपल्या आपल्या राजकीय सोयीनुसार घेतला असल्याचे दिसून येते.
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील बुटीबोरी नगरपालिकेत काँग्रेसने पंजाच गोठवून टाकला. शेवटपर्यंत कुठलाचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. या गोंधळात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. बुटीबोरी नगर पालिक भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघात येते. हिंगणा विधानसभा मतदारसंघावर केदारांचा डोळा आहे. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मेघे यांना खुले आव्हान दिले होते.
सोबतच जाहीर सभेत त्यांना पाडण्याचे आवाहन केदारांनी केले होते. त्यांचीच इच्छा या मतदारसंघातून लढायची होती. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात त्यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते निवडणूक लढू शकले नाही. हा मतदारसंघ महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला होता. त्यानंतरही केदारांच्या समर्थकांनी उमेदवारी दाखल केली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री रमेश बंग यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. यावरून आघाडी तणाव निर्माण झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.