Sushma Andhare On Mahayuti Sarkarnama
विदर्भ

Sushma Andhare On Mahayuti : महायुतीचे ग्रह-तारे अन् सुषमा अंधारेंचं भाकीत

Rajesh Charpe

Nagpur News, 12 Sep : राजकीय नेते आपापल्या सोयीने आणि पक्षाच्या बाजूने निवडणुकीच्या निकालाचे भाकीत वर्तवत असतात. एकीकडे महायुतीचे सरकार जाणार असे ठामपणे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा महायुतीचे पुढारी करीत आहेत.

अशातच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sudhma Andhare) यांनाही आपले मत व्यक्त केलं आहे. माझा ग्रह ताऱ्यांवर विश्वास नाही, मात्र महायुतीचे ग्रह फिरले हे मी खात्रीने सांगू शकते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

संकेत बावनकुळे याच्या ऑडीकारच्या अपघाताची शहानिशा करण्यासाठी त्या नागपूरला (Nagpur) आल्या होत्या. यावेळी त्यांनी बदलापूर, मराठा समाजाचे आंदोलन, नाशिकमधील रामगिरी महाराज यांच्यावरून निर्माण झालेला वादा, रोज घडणारे अपघात, अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी महायुतीचे भवितव्य सांगण्यासाठी आता भविष्यवेत्त्याची गरज राहिली नसल्याचा दावा त्यांनी केला.

भाजपला (BJP) आंदोलने हाताळता येत नाहीत. आंदोलकांना शांत करण्याऐवजी भाजपचे काही नेते वादग्रस्त विधाने करून त्यांना अधिक उद्युक्त करीत आहेत. लाठीमार करून आंदोलन चिघळवले जात आहे. मराठा आणि कुणबी यांच्यातील वाद सोडवण्याऐवजी हे सरकार आगीत आणखी तेल ओतत आहे. दोन्ही समाजाच्या प्रमुख नेत्यांना आमनेसामने बसवले जात नाही.

उलट आम्हालाच (उद्धवसेना) तुमची भूमिका काय? अशी विचारणा केली जाते. सरकार त्यांचे आहे. आरक्षणाचा विषय हा मुळात राज्य सरकारचा नाही. विधानसभेत सरकार म्हणून प्रस्ताव आणण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. त्यांनी प्रस्ताव आणला असता तर आमची भूमिका सर्वांना कळली असती असेही अंधारे म्हणाल्या.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुती चांगलीच बिथरली आहे. आता नवनवे प्रयोग केले जात आहेत. लाडकी बहीण योजना आणि किंवा लाडका भाऊ योजना आणल्या जात आहेत. मात्र त्याचा काही फायदा महायुतीला होईल असे वाटत नाही. भाजपने केवळ सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडले. त्यामुळे भाजपमध्येच सर्वाधिक असंतोष निर्माण झाला आहे.

त्यांच्या कार्यकर्त्यांची 10 ताटे आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची शंभार ताटे दुसऱ्याच्या वाट्याला गेली आहेत. आता महायुतीच्या विरोधात कोणी काही बोलले तर तुम्ही राजकारण करता हा एकच डॉयलॉग मारला जातो. लाठीचार्जचा, अत्याचाराचा, अन्ययाचा जाब विचारणे हे विरोधकाचे कर्तव्यच आहे. भाजपवाले विरोधात असताना उठसूठ आंदोलने करीत होती ते समाजकारण होते काय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT