Nana Patole  Sarkarnama
विदर्भ

Nana Patole on Jalna : जालन्यामध्ये पोलीस अधीक्षकांचा दोष काय? त्यांनी तर आदेशाप्रमाणेच काम केले !

Atul Mehere

जालन्यामध्ये पोलीस अधीक्षकांचा दोष काय? उलट सरकारनेच त्यांना आदेश दिले आणि पोलिस अधीक्षकांना फक्त आदेशाचे पालन केले. सरकारने सौम्य लाठीमार करण्याचा आदेश कसा काय दिला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचे निलंबन नको, तर सरकारने पायउतार झाले पाहिजे. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला द्यायचे, असे होऊ शकत नाही. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, अशा परिस्थितीत जनतेने एकत्रित येऊन काँग्रेससोबत (Congress) देश आणि संविधान वाचवायला पुढे आले पाहिजे. त्यासाठीच आम्ही यात्रा काढली आहे. भाजपच्या मूठभर मित्रांसाठी सर्वसामान्यांना लुटले जात आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला जागं करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि जनतेचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप सर्व्हेमध्ये आणखी खाली गेलेली बघायला मिळेल.

जालन्यात मराठा जनता त्यांचे न्यायिक हक्कासाठी बसलेली होती. मात्र त्यांच्यावर भाजपच्या (BJP) सरकारने लाठीचार्ज केला. ही दुर्दैवी घटना मराठवाड्यात घडल्यामुळे मराठवाड्यातील पदयात्रा आणि काही दिवस पुढे ढकलली आहे. सध्या जालन्याच्या घटनेमुळे जो वणवा पेटला आहे, तो विझवण्याचा काम आम्ही करणार आहोत.

लोकसभा निवडणुकीला (Election) अजून वेळ आहे. त्यामुळे ही यात्रा निवडणुकीसाठी असे म्हणता येणार नाही. तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात ही यात्रा आहे. जनतेला तानाशाही वृत्तीच्या भयापासून मुक्त करण्याचा यात्रेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना हिंमत देऊन जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ही यात्रा असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

फडणवीस सरकार असताना अनेक खोटी आश्वासने देण्यात आली होती. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यांसंदर्भात खोटी आश्वासन देण्यात आली होती. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून ज्या-ज्या मागास जाती आहेत त्यांना आरक्षण देता येऊ शकते. केंद्र सरकारने ते करावे. मोदी सरकारला ते करायचं नाही. उलट ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजेच मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (ता. २) नागपुरात मेळावा घेतला. यावेळी त्यांनी एकेकाळचे सहकारी असलेले कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांवर शरसंधान साधले. त्याचा खरपूस समाचार आज (ता. ४) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.

प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत आता काय बोलावं, आधी त्यांनी जे अनैतिक संबंध (भाजपसोबत) जोडले आहेत, त्याबद्दल बोलावे. तिकडे गेल्याबरोबर त्यांची भाषाच बदलून गेली. आता ते नरेंद्र मोदींचे गुणगाण गातात. भाजपने लोकशाही आणि संविधान दोन्ही धोक्यात आणले आहे, असे पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT