Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : भाजपला पराभव दिसत असल्याने नरेंद्र मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले

Atul Mehere

Nagpur Politics : देशभरात भाजपचा पराभव निश्चित आहे. महाराष्ट्रात तर भाजपचे पानिपत होणार आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राचे दौरे वाढले आहेत. मोदी आता पंतप्रधान कमी आणि प्रचारक जास्त वाटत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. नागपूर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र भाजपसाठी सर्वात कमजोर राज्य झाले आहे. देश तोडण्याचा काम जेव्हा जेव्हा झाले. तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने देशाला लोकशाही वाचविण्यासाठी ताकद दिली आहे. संवैधानिक यंत्रणेला संपविण्याचे काम भाजप करीत आहे. त्यामुळे आता जनतेने काँग्रेसला ताकद देण्याचा संकल्प केला आहे, असे पटोले म्हणाले.

डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना अनेक योजना मंजूर झाल्या. त्यातील पंतप्रधान गॅरंटी योजनाही त्यांच्याच काळातील आहे. त्याच योजनेच्या चाव्या आता नरेंद्र मोदी देत आहेत. त्यांना यासाठी दहा वर्षे लागली. भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे पंतप्रधानांनी 'खोटे बोलावे पण रेटून बोलावे' असे करू नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला. महाराष्ट्रातील भाजपचे शैक्षणिक धोरण म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद करणे आहे. ग्रामीण भागातील आणि गरिबांची मुले कुठे शिकणार? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

दीडशे रुपयांचे धान्य देऊन मोफत धान्य देण्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसने धान्य दिले, मात्र त्याचा प्रचार कधीच केला नाही. युवकांना रोजगार दिला. मोफत तांदूळ, मका, गहू देऊन गरिबांची चेष्टा करण्याचे काम भाजप करीत आहे. नागरिकांना आर्थिक दृष्टीने कमजोर करून शैक्षणिक व्यवस्था संपविण्याचे काम भाजप करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत बोलताना पटोले म्हणाले की, पृथ्वीराजबाबांना काही माहिती असेल. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत ते बोलले असतील. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मत मांडले असेल. काँग्रेस ‘हायकमांड’ याबाबत योग्य तो निर्णय घेईल. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही जाहीर करून हेच सांगितले आहे. महाराष्ट्रातील सर्व निवडणूक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात होणार आहे, असे पक्षाने जाहीर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेसच्या विजयाची पताका फडकावेल. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. ही लोकशाही भाजपसारखी नाही. नागपूर भाजपचे मंत्री यांना विचारा लोकशाही आहे, की ठोकशाही हे तपासून घ्यावे. राहुल गांधी, मलिक्कार्जुन खर्गे यांच्याबद्दलही वक्तव्ये केली जातात, कारण काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. काँग्रेसमध्ये हुकूमशाही नाही. भाजपमध्ये हुकूमशाही आहे. आतमध्ये खदखद आहे. भाजपमधील खदखद आपल्यापर्यंत पोहोचत आहे. योग्य वेळी ‘प्रॉपर पोस्टमाॅर्टेम’ करू, असेही त्यांनी सांगितले.

Edited by - Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT