Nana Patole on Eknath Shinde. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : आरक्षणावरील मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे संघ-भाजपची स्क्रिप्ट

जयेश विनायकराव गावंडे

Vidhan Bhavan : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. काँग्रेसने त्यासंदर्भातील आपली भूमिका विधिमंडळांत मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात वाद चिघळवला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेली ‘स्क्रिप्ट’ होती, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूरच्या विधानभवन परिसरात बुधवारी (ता. 20) प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. शिंदे समितीचे काम फक्त कुणबी प्रणाणपत्र देणे हेच आहे का, हे पाहावे लागणार आहे. प्रमाणपत्र देणे हे कायमस्वरुपी काम नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले की, अनेक जाती आरक्षण मागत आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्या समाज घटकांना आरक्षण द्यायचे आहे. पण या सर्वांवरचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे जातनिहाय जनगणना, असे पटोले यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकारने ही जनगणना करावी, म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. महाराष्ट्रात विविध समाजात लावलेली आगही थांबेल.

कांदा प्रश्नावर राज्य सरकारची दिल्ली भेट हा देखावा आहे. शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. आता दिल्लीला जाऊन काय करणार? इतके दिवस काय करत होते, हे ट्रिपल इंजिनचे सरकार? राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा चार-पाच दिवस गाड्यांमध्ये पडून राहिला. त्यामुळे हा कांदा खराब झाला. त्याचे नुकसान कोण भरून देणार? हे सरकार शेतकरीविरोधी आहे. कांद्याच्या प्रश्नासाठी दिल्ली भेट हा केवळ देखावा आहे, असाही आरोप पटोलेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील मोठा हिरे व्यापार सूरतला नेला. आता आणखी काही उद्योग गुजरातला पळवून नेता येतील का, यासाठी केंद्रातील गुजरात लॉबीचा प्रयत्न असेल, असा टोला पटोले यांनी लगावला. सरकारने अत्यंत कमी दिवसांचे अधिवेशन घेत राज्यातील विशेषत: विदर्भातील जनतेवर अन्याय केला आहे. केंद्र सरकारलाही संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य काय दोन्ही ठिकाणचे अधिवेशन ‘टाइमपास’ पद्धतीने सुरू असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT