MLA Rohit Pawar in Yuva Sangharsh Yatra at Washim. Sarkarnama
विदर्भ

Washim Rohit Pawar : स्पर्धा परीक्षा शुल्कवाढीतून सरकार तरुणाईला लुटतंय

जयेश विनायकराव गावंडे

MLA Rohit Pawar : सरकारने तरुणाईच्या हाताला रोजगार द्यायला पाहिजे. बेरोजगार असलेल्या युवक-युवतींना भत्ता द्यायला पाहिजे, परंतु महाराष्ट्रात असं काहीच होताना दिसत नाही. उलट स्पर्धा परीक्षांच्या शुल्कात वाढ करून सरकार बेरोजगार तरुणाईचे खिसे कापत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वाशिम येथे केली.

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं पवार यांचं वाशिम जिल्ह्यात आगमन झालं. या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात बेरोजगार तरुणाईचं प्रमाण मोठं आहे. यातील अधिकांश तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, असं ते म्हणाले. (NCP Sharad Pawar Group MLA Rohit Pawar Criticized Government At Washim For Increasing Fees Of Competitive Exams In Maharashtra)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आरोग्य विभाग, पोलिस, वन, महसूल, अभियांत्रिकी सेवा, उत्पादन शुल्क विभाग, म्हाडा, आदिवासी विकास विभाग, कृषी, ऊर्जा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जलसंपदा, विधी व न्याय अशा शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्यात येतात. आता अनेक परीक्षांच्या शुल्कात सरकारने भरमसाठ वाढ केली आहे. काही परीक्षांचे शुल्क तर एक हजार रुपये केले आहे. ही सरासर बेरोजगारांची लुबाडणूक आहे, अशी टीका आमदार पवार यांनी केली.

राज्यात कायमस्वरूपी नोकऱ्या नाहीत. सरकार कंत्राटी पद्धतीनं नियुक्त्या करतेय. नियुक्त्यांची कामं विविध एजन्सींना देण्यात आली आहे. परीक्षा घेण्याचं कामही अशा एजन्सी करीत आहेत. असं असताना सरकार परीक्षा शुल्काच्या माध्यमातून आपली तिजोरी भरण्यासाठी काम करतेय का, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. हे सरकार लुटारू आहे. तरुणांचे खिसे कापतेय. कोणता बेरोजगार मुलगा किंवा मुलगी दरवेळी एक हजार रुपये भरू शकतो, असा सवाल त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्पर्धा परीक्षा झाल्यानंतरही निकाल तातडीनं लावले जात नाहीत. अधिकारी आपल्या मनात येईल तेव्हा निकाल जाहीर करतात. त्यामुळं नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला वेगवेगळ्या परीक्षा देण्याशिवाय पर्याय नसतो. विदर्भातील शेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतो आणि मुलांच्या परीक्षा फीसाठी रक्कम गोळा करत असतो. आई-वडिलांचे काबाडकष्ट, परीक्षा शुल्काचा भार आणि नोकरी मिळण्यासाठी होणारा विलंब पाहता, अनेकांनी आतापर्यंत आत्महत्याही केल्या आहेत. या आत्महत्या नसून एकप्रकारे हत्याच आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तरुणाईचे सारे प्रश्न मांडणार आहेत. यासंदर्भात आम्ही प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री उत्तर देतात की, आताची पिढी कोणताही विषय गांभीर्यानं घेत नाही. युवा संघर्ष पदयात्राच मुळात तरुणाईसाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद हे दाखवतोय, की युवा पिढी शिक्षण आणि करिअरबद्दल किती चिंतित आहे. मंत्र्यांनी हे चित्र पाहावं आणि आपला कारभार सुधारावा, असा सल्लाही आमदार रोहित पवार यांनी दिला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT