Protest in View of Election 2024. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : अकोल्यात आंदोलनाचे पीक; विरोधी पक्षांचे नेते आक्रमक

जयेश विनायकराव गावंडे

Akola Politics News : 2024 हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार आहे. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. निवडणुकांपूर्वी सत्ताधाऱ्यांतील उणिवा शोधत त्यावर आंदोलन करण्यात विरोधी पक्ष सरसावले आहेत. त्यासाठी या पक्षामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात विविध पक्षांच्या सुरू असलेल्या या धडपडीमुळे एकप्रकारे आंदोलनाचे पीक अकोला जिल्ह्यात आले आहे. त्यामुळे सध्या येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. निवडणुकीमुळे हे वर्ष गाजणार आहे. आगामी निवडणुकांसाठी जवळपास सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांसमोर जाण्यासाठी मतदारांच्या प्रश्न, समस्या यावर लक्ष ठेवून असलेल्या पक्षांकडून आंदोलनाच्या माध्यमातून ती आम्हीच सोडवू शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी कसा अपयशी ठरला किंवा वेळेवर येणाऱ्या भावनिक प्रश्नांवर आंदोलन करण्याचा जणू काही या पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंगच बांधला आहे. आगामी लोकसभा निवडणूक बघता आंदोलनाच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी सध्या आंदोलन करण्यात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुन्हेगारी, रस्त्याच्या समस्या, अंडरपासचा मुद्दा, गांधीग्राम येथील पुलाचा मुद्दा, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, शहरातील जिजाऊ सभागृहाचा प्रश्न यासह इतरही विविध भावनिक मुद्द्यांवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. ‘नया साल नया खासदार’ म्हणत निवडणुकीची जोरदार तयारी विविध माध्यमातून केली जात आहे. त्यात आंदोलनाचे हत्यारही जोरदार वापरले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटही शहरातील मुद्द्यांवरून अधिक आक्रमक झाला आहे. कॅफेमध्ये चालणारे गैरप्रकार, महापालिकेचा करवसुलीच्या कंत्राटावरून आंदोलन, विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी काढण्यात आलेला मोर्चा, पीक विमा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील समस्यांवरील आंदोलन ‘हायजॅक’ करून त्यावर आपले नाव कोरण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन आंदोलन होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे इतर पक्षांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. एखादा अपवाद सोडला तर हे पक्ष सध्यातरी ‘अॅक्टिव्ह मोड’वर आलेले नाहीत. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येईल, तसतसे राजकीय पक्ष मतदारांना आपलेसे करण्यासाठी अधिक प्रयत्न करताना दिसणार आहेत.

विविध प्रश्नांवर आंदोलन करून ते प्रश्न शासनदरबारी मांडण्याचा प्रयत्न जरी राजकीय पक्षाकडून होत असला, तरी याला कितपत यश येते पाहणे महत्त्वाचे आहे. काही प्रश्न हे आंदोलनाच्या माध्यमातून सुटतात. मात्र अनेक प्रश्न हे आंदोलनाच्या माध्यमातूनही सुटत नाहीत. समस्या सोडवण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधीला निवडणुकीत जनतेने संधी दिली त्यांनीच ते पाच वर्षांत सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लोकांचे प्रश्न सुटतील.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT