BJP vs Congress Sarkarnama
विदर्भ

Congress Vs BJP: राहुल गांधींनी मतचोरीचा पहिला आरोप केलेल्या भाजपच्या नेत्याच्या मतदारसंघातून काँग्रेस मोठा लढा उभारणार

Congress Politics : कामठीतून सुरू होणाऱ्या या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील नेते सतेज पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह विदर्भातील खासदार, आमदार यांच्यासह सर्वच नेते सहभागी होणार आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपांवरून देशभर खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी लागली. आयोगाने त्यांचे आरोप खोडून काढले असले तरी काँग्रेस मात्र आपल्या मतावर ठाम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रभर हा मुद्दा तापवण्याचे ठरवले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) सर्वप्रथम भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा झाल्याचा आरोप केला होता. त्याच कामठीमधून काँग्रेसने ‘व्होट चोर गद्दी छोड' हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

कामठीतून सुरू होणाऱ्या या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील नेते सतेज पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह विदर्भातील खासादर, आमदार यांच्यासह सर्वच नेते सहभागी होणार आहेत. बुधवारी (ता.३) दुपारी बारा वाजता पदयात्रा काढील जाणार आहे.

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार आहे. येथून हे आंदोलन महाराष्ट्रभर पोचवल्या जाणार आहे. ही लढाई एकट्या काँग्रेसची नाही तर समाजाच्या सर्वच घटकाची आहे. भाजपने संविधान गुंडाळून ठेवले आहे.

आता संपूर्ण निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली आहे. उद्या तुमचा आमचा बोलण्याचा अधिकारी काढून घेतला जाणार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या 300 खासदारांना भेटण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. हा खासदारांचा अपमान नसून सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे (Congress) नेते सुनील केदार यांनी सांगितले.

कामठीपासून सुरू होणारे आंदोलन पुढे संपूर्ण देशात नेण्यात येणार आहे. याचे उत्तर भाजपला आज ना उद्या द्यावेच लागणार आहे. आमचे नेते राहूल गांधी यांनी आरोप केल्यानंतर भाजपचे नेते त्याला उत्तर देतात. त्यांना खुलासे करावे लागत आहे. खासदारांना भेटण्यास नकार देणाऱ्या निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद घ्यावी लागते यावरून पाणी कुठेतरी मुरत आहे सिद्ध होते.

निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती आहे. हे सर्वांसाठीच घातक असल्याचे सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आंदोलनाचे समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसने रवींद्र दरेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, अभिजित सपकाळ, सुरेश भोयर, याज्ञवल्क्य जिचकार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आश्विन बैस, कुंदा राऊत, प्रकाश वसू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT