Ramdas Athawale & Prakash Ambedkar. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आठवले कोणते काव्य रचणार?

जयेश विनायकराव गावंडे

Akola Politics : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या अनोख्या आणि हटके कवितांसाठी सर्वत्र चर्चेत असतात. आता हेच काव्य ते अकोला येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी गाजणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे निवडणुकीपूर्वी आठवले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या गड मानल्या जाणाऱ्या अकोल्यात येत आहेत.

रामदास आठवले अकोल्यात गायरान जमीन धारकांसाठी परिषद घेणार आहेत. याच प्रश्नावरून ‘वंचित’कडून मोर्चा काढण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या ‘12-12 फॉर्मूल्या’चे आम्ही बारा वाजवू, अशी टीका रामदास आठवले यांनी केल्यानंतर आता थेट आव्हान देण्यासाठी आठवले अकोला दौऱ्यावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आठवले आपल्या अकोला दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठवले आपल्या कवितांच्या माध्यमातून टीकाही करतात आणि हंशाही पिकवतात. त्यांच्या संसदेतील कविता असो किंवा जाहीर सभेतील, त्यांची जोरदार चर्चा असते. कवितेतून ते कुणाचे गुणगान करतात तर कुणाला आडव्या हातानेही घेतात. अशात अनेक दिवसांच्या खंडानंतर ते अकोल्यात येत आहेत.

रामदास आठवले 15 जानेवारीला अकोला येथे पोहोचतील. दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम ठरले आहेत. ते सभेलाही संबोधित करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अकोला जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा गड मानला जातो. प्रकाश आंबेडकर हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी तशी घोषणाही केली आहे. निवडणुकीसाठी जोरात तयारीही सुरू आहे. अशातच रामदास आठवले हे अकोल्यात येऊन वंचितच्या प्रयत्नांना ‘काव्य सुरूंग’ लावणार का, अशी उत्सुकता सर्वांना आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रातील मोदी सरकारसोबत आठवले सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून भाजपने वंचित बहुजन आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘वंचित’ने जिल्ह्यातील दलित, मुस्लिम, बंजारा मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातील दलित मतदारांना ‘वंचित’कडे जाण्यापासून रोखण्यासाठी महायुतीने ‘आठवले कार्ड’ वापरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

अकोला जिल्ह्यातील गायरान जमिन अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावे कायमस्वरुपी सात-बारा मिळवून देऊ, सरकारी जमिनीवर रहिवासी असलेल्या बेघर गरीबांना घरकुलाचा लाभ मिळवून देऊ असे म्हणत रिपाईच्यावतीने गायरान अतिक्रमण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील गायरान जमिनधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. आता हाच मुद्दा पुढे करीत भाजपकडून रामदास आठवले यांच्या माध्यमातून आंबेडकर यांच्याच बालेकिल्ल्यात सभा ठेवण्यात आली आहे.

अकोल्यात भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जात आहे. दलित मतदान मिळवण्यासाठी आठवलेंच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. आंबेडकर यांनी ‘फोकस’ केलेला मुद्दा पुढे करीत त्याच प्रश्नांवरून आंबेडकर यांच्या बालेकिल्ल्यात आठवलेंचे आंदोलन सध्या तरी हेच सांगत आहे. त्यामुळै अकोला येथील सभेत रामदास आठवले नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून बोलतात आणि कोणते काव्य रचनात हे बघण्यासारखे आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT