Rashmi Barve Vs Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Rashmi Barve Vs Devendra Fadnavis : रश्मी बर्वे यांनी डागली फडणवीसांवर तोफ; म्हणाल्या, 'देवाभाऊ कधीतरी..'

Rajesh Charpe

Rashmi Barves criticism of BJP : जात वैधता वैध ठरवल्याचा उच्च न्यायालयाचा आदेश हाती पडताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी थेट भाजप नेत्यांवर तोफ डागली. ‘देवाभाऊ कधीतरी देवासारखे वागा` असे सांगून त्यांनी लोकसभेप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करू असा इशाराही दिला.

जात पडतळणी समितीने जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने रश्मी बर्वे(Rashmi Barve) यांना लोकसभेची निवडणूक लढता आली नव्हती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द ठरवून त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. लोकसभेची हुकलेली संधी विधानसभेत मिळणार का? या प्रश्नावर त्यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय पक्ष घेत असतो असे म्हटले.

तसेच, त्यांनी 'लढायला सांगितल्यास लढेल किंवा जी जबाबदारी देईल पार पाडल्या जाईल. मात्र आता आमच्या सर्वांचा उद्देश भाजपला(BJP) पराभूत करणे आहे. एका दलित महिलेने निवडणूक लढू नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी षडयंत्र रचले होते. हे न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे. महिला आणि दलितांवर भाजप कसा अन्याय करते, सूडबुद्धीने कारवाई करते हे आता घरोघरी पोहचल्या जाईल.' असंही म्हटलं आहे.

याशिवाय रश्मी बर्वेंनी म्हटले आहे की, 'लोकसभेची निवडणूक लढता आली नाही. याची काही खंत नाही मात्र भाजपने जे षडयंत्र रचले होते, माझी जात चोरली होती याचे सर्वाधिक दुःख आहे. एवढे सारे करून भाजपला काहीच फायदा झाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजपचे मनसुबे उधळून लावले.

श्यामकुमार बर्वे यांना खासदार केले. त्यामुळे आपले काही नुकसान झाले नाही. श्यामकुमार बर्वे यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येऊन गेले. काही नेते ठाण मांडून बसले होते. मात्र जनतेने खोटारड्या व एका दलित महिलेच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना नाकारले आहे.' अशी टीका बर्वेंनी केली आहे.

तर 'अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपच्या नेत्यांनी हे षडयंत्र रचले होते. असा थेट आरोपही त्यांनी केला. एकीकडे महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना आणल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे महिलेने निवडणूक लढण्यापासून वंचित ठेवायचे असे दुटप्पी धोरण भाजपचे आहे असा आरोप करत त्यांनी ‘देवाभाऊंनी‘ देवासारखे वागावे, असा टोला लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT