Mohan Bhagwat Sarkarnama
विदर्भ

Mohan Bhagwat : "भारतातील हिंदूंना लक्षात यायला पाहिजे की...," बांग्लादेशातील अत्याचारावर बोलताना मोहन भागवतांचं मोठं विधान

Jagdish Patil

Nagpur RSS Dasara Melava 2024 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात विजयादशमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते यावेळी शस्त्रपूजन करण्यात आलं.

यानंतर भागवत यांनी उपस्थितांना संबोधित करताना भारतासह जगभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी हिंदू समाजाला संघटित होण्याची गरज असल्याचं सांगत बांगलादेशमधील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारावरही भाष्य केलं.

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, "यंदा संघ स्थापनेच्या 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. देश बलशाली व्हायचा असेल तर प्रजेत चारित्र्य असणे आवश्यक आहे. चारित्र्याच्या जोरावरच देश मोठा होतो. इस्रायल आणि हमासमधील युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. आपला देश पुढे जात आहे कारण तो सर्वांना मदत करतो.

आपला देश शत्रूनांही वेळप्रसंगी मदत करतो. मात्र, जगात अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारताने पुढे जाऊ नये असे वाटते, असा सूचक वक्तव्य त्यांनी केलं. तर आपला देश पुढे जात असल्याचं सांगतच आपल्याला काही शक्ती रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले, "आपला देश तंत्रज्ञान विज्ञान अशा सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. योग जगभरात मान्यता मिळवत आहे. पर्यावरणाबद्दलचे भारताचे विचार जग स्वीकारत आहे. भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. ही प्रगती चालत राहिली पाहिजे.

मात्र, काही आव्हान आपल्यासमोर आहेत. ती फक्त संघ, हिंदू (Hindu) समाज किंवा भारतासमोर नाहीत तर संपूर्ण जगासमोर आहेत. पण काही शक्ती भारत पुढे जाऊ नये असे प्रयत्न करत आहेत. भारताला दाबण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ज्यांना भारत पुढे जाईल, आपल्याला आव्हान बनेल अशी चिंता वाटत आहे, ते अडथळे आणत आहेत, असं भागवत म्हणाले.

शिवाय तेच लोक निवडलेले सरकार खाली खेचण्याचे काम ही करतात. असे व्हायला नको, पण असं होत आहे. भारताच्या शेजारी बांग्लादेशात (Bangladesh) हेच घडलं. तिथे हिंदू समाजाला लक्ष्य करत अत्याचार करण्यात आले. हिंदू समाजाने संघटित होऊन प्रतिकार केला. त्यांना भारत सरकारने मदत केली पाहिजे.

बांगलादेशातील हिंदूंना जगभरातील हिंदू समाजाकडून ही मदतीची आवश्यकता आहे. भारतातील हिंदू समाजाला लक्षात यायला पाहिजे की, दुर्बल राहणे नुकसानीचे आहे. हिंदूनी सशक्त राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी हिंदू समाजाला केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT