Bhavana Gawali, Eknath Shinde, Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Vashim: एकाच म्यानात तीन तलवारी : संख्याबळाच्या नादात एकनाथ शिंदेंनी वाढवली 2029 ची डोकेदुखी

Sanjay Deshmukh, Shiv Sena, Washim Yavatmal Politics: वाशीम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांमध्ये नाराजी असून विकासाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Deshmukh: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी अचानक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाभर देशमुख यांच्या विरोधात आंदोलनाची राळ उठवली आहे. त्याचवेळी शिवसेनेनेही देशमुख यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.

एका बाजूला शिवसेनेत देशमुख यांचे स्वागत होत असले तरीही देशमुख यांच्या प्रवेशाने नाराज असल्याचेही बोलले जाते. संजय राठोड, भावना गवळी अशी दोन सत्ताकेंद्र जिल्ह्यात अस्तित्वात असतानाच संजय देशमुख यांचाही पक्षप्रवेश झाल्याने एकाच मान्यात किती तलवारी ठेवणार असा प्रश्न विचारला जात आहेत.

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत गेले पाहिजे या मताच्या श्रीकांत शिंदे यांच्यानंतर भावना गवळी दुसऱ्या खासदार ठरल्या होत्या. सध्याही त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या असून, जिल्ह्यातील शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. पाच वेळा खासदारकी मिळवून त्यांनी आपली मतदारसंघातील पकड दाखवून दिली आहे.

संजय राठोड यांची आमदारकीची पाचवी टर्म आहे. मागील 12 वर्षांपासून ते मंत्री आहेत. अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचीही जिल्ह्यावर पर्यायाने मतदारसंघावर चांगली पकड आहे. गतवेळीही ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळी पत्नीच्या उमेदवारीसाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती.

आता आगामी लोकसभेला पुन्हा संजय राठोड, भावना गवळी हे नेते इच्छुक आहेत. दोन सत्ताकेंद्रांमुळे शिवसेनेत जिल्ह्यात आधीच शह काटशहाचे राजकारण सुरू असते. त्यात संजय देशमुख यांचाही पक्षप्रवेश झाल्याने वरिष्ठ जिल्ह्यात भानगडी लावण्याचे काम करत असल्याचे मत व्यक्त केले जाते. या राजकीय गदारोळात सर्वसामान्य मतदार मात्र संतप्त झाल्याचे चित्र आहे.

मतदारही नाराज

मागील लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांत सरळ सामना झाला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय देशमुख विजयी झाले होते. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी खासदार देशमुख यांच्या विजयासाठी एकदिलाने मेहनत घेतली होते.

आता हेच खासदार देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षही संतप्त आहेत. खासदाराला जनतेने दिलेला जनादेश हा भाजप-शिवसेनेच्या विरोधातला जनादेश होता. हा जनादेश पुन्हा महायुतीच्या दावणीला बांधण्याचे काम खासदार देशमुख यांनी केले असून, आमचा जनादेश सोडून तुम्ही कुठेही जा. परिणामी राजीनामा द्या, असा संतप्त सूर मतदारांतून उमटत आहे.

विकासाचा बागुलबुवा

खासदार संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताना मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पुढे करीत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांत खासदार संजय देशमुख यांना १८.६ कोटी निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १.४२ कोटी रुपये विकास कामावर खर्च झाले. १०६ कामांपैकी केवळ ७ कामे पूर्ण झाली आहेत. खासदाराच्या निधीतील दोन वर्षात केवळ ७ टक्के निधी खर्च होत असेल तर खासदार देशमुखांचा विकासाचा दावा फोल असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT