Bhavna Gawali & Sanjay Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून ठाकरेंचा उमेदवार ठरला

प्रसन्न जकाते

Yavatmal-Washim : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला तगडे आव्हान देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट सज्ज झाला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट रामटेक आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची जागा लढविणार आहे. यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. ठाकरे गटाचा यवतमाळ-वाशिमसाठी उमेदवारही ठरला आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून मिळाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना अनेक ठिकाणी बघायला मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तर ही रंगत आणखी चूरसपूर्ण होणार आहे. अशात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दोन्ही शिवसेना प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यामागे सध्या आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे. गवळी यांनी अलिकडेच अकोल्याच्या आयकर विभागात याप्रकरणी हिशोब सादर केला आहे. ईडीची पीडा टळत नाही, तोच त्यांच्यामागे आता आयकर विभाग लागला आहे. अशात भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यासाठी महायुतीमधील अनेक नेते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भावना गवळी यांनी ‘मेरी झांसी नहीं दूंगी’, अशी घोषणा केली होती. महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांनी उपस्थित नेत्यांना ‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ अशी भावनिक साद घातली होती.

अशात आता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना चांगलाच रंगणार आहे. भावना गवळी यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने चंग बांधला आहे. एकवेळ आपला उमेदवार पराभूत झाला तरी चालेले परंतु भावना गवळी विजयी होणार नाहीत, याची काळजी ठाकरे गट घेत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने यवतमाळ-वाशिम मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसलाही हा मतदारसंघ पाहिजे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस या मतदारसंघात अल्पमताने पराभूत होत आली आहे. त्यामुळे काँग्रेस यवतमाळ-वाशिमवरील आपला दावा सोडायला तयार नाही. अशात वरिष्ठ पातळीवर झालेल्या नियोजनानुसार उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघावर जोरदार दावा करून कुठल्याही स्थितीत ही जागा ठाकरे गटाला सुटावी, अशी आग्रहाची भूमिका घेतली आहे. जवळपास ठाकरे गटाच्या नेत्यांनी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना मतदारसंघात कामी लागण्याचेही निर्देश दिले आहेत.

‘मातोश्री’वरून मिळालेल्या आदेशांनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून देशमुख पूर्णपणे ‘अॅक्टिव्ह३ झाले आहेत. अलिकडेच राळेगाव तालुक्यातील काही कार्यक्रमांनाही माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासमवेत हजेरी लावली. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी जुन्या दिग्रस मतदारसंघातून संजय देशमुखांनी दोनदा अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक जिंकली. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष राहूनही 75 हजारांच्या घरात मते घेतली. शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड यांना त्यांनी तगडे आव्हान दिले होते.

दिग्रस तालुक्यातील अनेक संस्था देशमुखांच्या ताब्यात आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकत्यांचीही फौज त्यांच्याजवळ आहे. विशेष म्हणजे ते शिवसेनेचे काही वर्षांपूर्वी जिल्हाप्रमुखही राहिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. देशमुख यांच्या जनसंपर्काचा ठाकरे गटाला फायदा करून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना कामाला लागण्याची सूचना देण्यात आली आहे. विदर्भातील दोन जागा या शिवसेना ठाकरे गटासाठीच सुटतील अशी दाट शक्यता असल्याने रामटेक आणि यवतमाळ-वाशीम मतदार संघात सध्या सेना नेत्यांचे दौरेही वाढले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT