Chandrapur Farmers News : Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Farmers News : शेतकऱ्यांच्या पाणावलेल्या नजरा पाहून सुधीर मुनगंटीवारांचा मोठा निर्णय

संदीप रायपूरे

Chandrapur Politics : बरीच वर्षे कापसाची पिके घेऊन कंटाळलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील शेतकरी बांधवांनी यंदा सोयाबीनला पसंती दिली. प्रचंड परिश्रमाने आणि तेवढ्याच आशेने त्यांनी पिकाची मशागत केली. पण पिवळा मोझॅक रोगाने हिरवीगार सोयाबीनची पाने पिवळी पडली अन् जवळपास संपूर्ण सोयाबीनचं पीक पुरतं मातीमोल झालं. ही परिस्थिती आहे चंद्रपूरची.

एकूण हवामान व रोगांच्या प्रादुर्भाव पडला असताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर दौऱ्यावर आले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे चिंतेचे भाव आणि पाणावलेल्या कडा त्यांना दिसल्या. त्याचवेळी त्यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी साद घातली. याचवेळी त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही पत्र पाठवले.

मृदा संतुलन बिघडले आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या. नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करताना तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला पाहिजेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

आता पिकाचा हंगाम गेल्याने दुसरे पीक घेण्याचा पर्यायच नाही. अशावेळी सरकारकडे ते मोठ्या आशेने बघत आहेत. जिल्ह्यात अशा पद्धतीचा रोग पहिल्यांदाच आल्याने गोंधळलेल्या बळीराजाला धीर देण्यासोबत मदतीबाबत आश्वस्त करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शेताच्या बाधांवर पोहाेचले. रोग आल्याने पिकाची झालेली स्थिती व यातून बळीराजाच्या वाट्याला आलेले नैराश्य बघून ते हळवे झाले, अन् थेट मुख्यमंत्र्यांकडे चंद्रपूर जिल्ह्याला मदतीचे विशेष पॅकेज देण्याची विनंती केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. या पिकांवर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीमही हाती घेतली. परंतु सोयाबीनचे पीक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्ण तापमान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

या रोगाने जवळपास शंभर टक्के सोयाबीन पीक पूर्णत: नष्ट होणार असल्याने मोठे संकट बळीराजासमोर आले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या बाबीची जाणीव होताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तेटावार यांना सोबत घेतले व थेट शेताच्या बांधावर पोहाेचले. त्यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा येथील शेतशिवारात सोयाबीन पिकांवरील रोगांमुळे नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरियल ब्लॉइट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसांत सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते.

शेतकऱ्यांच्या मागील हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते. याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रिक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती. ती रक्कम जमा करण्याबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT