Sushma Andhare at Akola. Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : केंद्रात स्पष्ट बहुमत असतानाही भाजप मराठ्यांना खेळवतेय

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : मराठा आरक्षण ही आपल्या अधिकार क्षेत्रातील गोष्ट नाही. आरक्षण द्यायचे असल्यास संविधानातील मर्यादेची अट शिथिल करावी लागणार आहे. राज्य सरकारला ही बाब चांगलीच ठाऊक आहे. केंद्रात भाजपचं पूर्ण बहुमत असलेलं सरकार आहे. असं असतानाही भाजप महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत निव्वळ खेळतेय, अशी प्रखर टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

अकोला येथे सोमवारी (ता. २०) अंधारे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. नव्यानं कुणालाही आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, परंतु तरीही सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासनं देत देत आहे.

मराठा आरक्षण हा थेट केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे, हे ठाऊक असतानाही भाजप जाणीवपूर्वक ही खेळी खेळत असल्याचं अंधारे म्हणाल्या. (Shivsena Uddhav Thackeray Group's Leader Sushma Andhare Criticized BJP At Akola For Passing Time On Maratha Reservation)

मराठा, ओबीसींसह अन्य समाजांनाही भाजप भुलवत आहे. आरक्षणाचे विरोधक आणि समर्थक महायुतीच्या सरकारमध्येच आहेत. काही जण मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचा देखावा करीत आहेत. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांचा छुपा पाठिंबा आहे.

मुळात राज्य सरकारला हे आरक्षण देता येतं का हा विचार आधी केला गेला पाहिजे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषयावर सरकार टाइमपास करीत असल्याबद्दल त्यांची संताप व्यक्त केला. मराठा आरक्षण देण्याची मुळात भाजपची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच त्यांनी आरक्षण देताना त्यात त्रुटी ठेवल्या होत्या, अशी टीकाही अंधारे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस, गोऱ्हे, वाघ, चाकणकरांवर टीका

अकोल्यातील खदान भागात बालिकेवर बलात्कार झाला. या मुलीला सिगारेटचे चटकेही देण्यात आले व तिचे केसही आरोपीने कापले. यावर अंधारे यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत.

ते गृहमंत्री झाल्यापासून राज्यात दंगली होत आहेत, महिलांवरील अत्याचार वाढलेय, ड्रग्समाफिया आराम फर्मावत आहेत, असा घणाघात अंधारे यांनी केली. अकोल्यातील बलात्कार पीडित बालिकेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आर्थिक मदत देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या.

यासंदर्भात आमदार नितीन देशमुख यांच्यासह विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचं अंधारे यांनी स्पष्ट केलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावरही अंधारेंनी निशाणा साधला. चाकणकरांनी मुलींना टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधण्याचं आवाहन केलं. त्यावर शालेय विद्यार्थिनींजवळ फोन असतात का, असा सवाल त्यांनी केला.

शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाही लक्ष्य करीत अंधारे म्हणाल्या की, बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणाचे राजकारण कुणी करू नये, असा सल्ला त्या देतात. सत्तेसाठी इमान गहाण ठेवणाऱ्यांनी अत्याचाराच्या प्रकरणांवर भाष्य करूच नये. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आम्ही जात-धर्म शोधत नाही, असे नमूद करीत त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही टोला लगावला.

अंधारे यांच्यासह या वेळी ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गट नेता गोपाल दातकर, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख विकास पागृत, अतुल पवनीकर आदी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT