Vijay Wadettiwar-Gopichand Padlkar-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Padalkars: पडळकरांना अजितदादा हे सिंह असल्याचे दाखविण्याची वेळ; वडेट्टीवारांचा निशाणा नेमका कोणावर?

Vijaykumar Dudhale

Nagpur News : अजित पवार हे सिंह आहेत, हे दाखविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पडळकर नावाचा चिल्लर माणूस अजितदादांना लांडगा म्हणत असेल, तर अजितदादा वाघ, सिंह, हत्ती आहेत, अशी उपाधी लावून अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील, त्यावेळी ते वाघ, सिंह आणि हत्ती ठरतील, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांनाही डिवचले. (Time to show the Padalkars that Ajitdada is a lion : Vijay Wadettiwar)

धनगर आरक्षणासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. पण अजित पवार यांना निवेदन दिले नाही. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, अशी टीका केली होती. त्यावर विजय वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले की, सत्तेची हपापलेली माणसं सत्तेसाठी कुठंही जाऊ शकतात. सत्तेतून मिळविलेलं पाप लपविण्यासाठी सत्ता वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गणेशाचे आगमन म्हणजे घराघरांत आनंदाचा सण असतो. हा उत्सव कुटुंबाला एकत्र आणणारा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सरकारला सुबुद्धी येवो. पुढच्या दहा दिवसांत सगळ्यांना सद्बुद्धी मिळेल. शेतकऱ्यांना आनंद मिळेल, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेन, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणावर वडेट्टीवार म्हणाले की, १९७४ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पहिल्यांदा संसदेत आला होता. देवेगौडा यांच्या काळातही मुद्दा पुढे आला होता, त्यांनीही प्रयत्न केले होते. पण, त्यांचे अल्पमताचं सरकार कोसळलं. त्यानंतर महनमोहनसिंग यांच्या काळातही २०१० हा मुद्दा पुढे आला होता. राज्यसभेत हे बिल पास झाले होते. मात्र, लोकसभेत पुरेसं समर्थन न मिळाल्याने महिला आरक्षणाचे बिल मंजूर होऊ शकलं नव्हतं. महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा काँग्रेसने पहिल्यांदा मांडला. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. आज महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचे स्थान मजबूत केल्यामुळे आज आम्हाला आनंदच आहे; पण या आरक्षणाची सुरुवात काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा महिला आरक्षणाला विरोध नव्हता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर महिला शक्ती ही मजबूत होईल. महिला सक्षमीकरणासाठी वाव मिळेल. महिलांचे राजकारणातील स्थान अधिक बळकट होईल. इंदिरा गांधी यांच्यासारखी एखादी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पाहायला मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, महिलांना आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण हे राजीव गांधी यांच्या काळात सुरू झालं. हे विधेयकच मुळात काँग्रेसने मांडलेले आहे. पण, संख्याबळानुसार ते मंजूर होऊ शकलं नाही. पण आज या सरकारने केले तरी हुकमी एक्का कसला. महिलांची आजची स्थिती, मूलभूत समस्यांसंदर्भात बघता मोदींचा हुकमी एक्का ठरत नाही. महिला आरक्षणामुळे दिग्गजांचा मतदारसंघ आरक्षित होऊ शकतो. अनेकांना इच्छा नसताना निवृत्ती घ्यावी लागेल. अनेकांना आरामच करावा लागेल, असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT