Nagpur News : सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असातात. त्यांना शोधायचे असल्याने फेसबुकवर जावे लागते. अलीकडे त्यांनी 'रिल स्टार' अशी नवी ओळख आपली निर्माण केली आहे. माध्यमांना नेमकं काय हवं, कुठली बातमी व्हायरल होऊ शकते आणि कुठला फोटो माध्यमांना हवा याचाही चांगलाच अभ्यास त्यांना आहे. काहीतरी वेगळे करण्याचा छंद आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना चांगलाच महागात पडला आहे.
भाजप आमदार आशिष देशमुख यांनी गुरुवारी (ता.14) वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्याची दुचाकी चालवायला घेतली. त्यांनी ही गाडी हेल्मेट न घालता फिरवली. हा फोटा व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का बसला. वाहतूक पोलिसांनी त्यांना चक्क अडीच हजार रुपयांचे चलन पाठवले आहे. हेल्मेट न घालता वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भाजपचे (BJP) आमदार आशिष देशमुख यांनी दोन बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपले काका व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची कारकीर्द खंडित केली होती. काँग्रेसमध्ये असताना देशमुख यांनी थेट दिल्लीत भाजपचे तत्कालीन खासदार वरुण गांधी यांच्या आंदोलनात जाऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ते रातोरात प्रसिद्धीस आले होते.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शेवटच्या क्षणी त्यांना काटोल विधानसभा निवडणुकीतून काका अनिल देशमुख यांच्याविरोधात लढण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी अनिल देशमुखांना पराभूत करणे अवघड आहे, असेच सर्वांना वाटत होते. निवडणूकसुद्धा अतिशय चुरशीची झाली. काका-पुतण्याची ही निवडणूक चांगलीच गाजली होती.
मतदानाच्या शेवटच्या फेरीपर्यंत सर्वांचे श्वास रोखले होते. या अटीतटीच्या निवडणुकीत आशिष देशमुख विजयी नोंदवला. मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर देशमुखांनी भाजप नेत्यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले. आपल्या आंदोलनाची कोणी दखल घेत नसल्याचे बघून देशमुखांनी राजीनामा दिला. तीन वर्षे ते आमदार होते. नंतरचे दोन वर्षे काटोल विधानसभा मतदारसंघाचा कारभार आमदाराशिवायच चालला. त्यामुळे अनिल देशमुख यांना पुन्हा पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर तोफ डागणे सुरू केले. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी जाहीर मागणी केल्यानंतर त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नंतर ते पुन्हा भाजपात परतले.
सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे बडे नेते मानले जात असलेले माजी मंत्री सुनील केदार यांना पराभवाचा धक्का दिला. 2024 च्या निवडणुकीत न्यायालयाच्या निकालामुळे केदारांच्या ऐवजी काँग्रेसने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. आता आशिष देशमुख यांनी वरिष्ठ नेत्यांशी पंगे घेणे सोडले असले तरी सोशल मीडिवरील उत्साहामुळे ते ट्रोल होऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.