Nagpur : लोकसभेची निवडणूक एकत्रित लढल्यानंतरही महायुतीला जोरदार फटका बसला. हे बघता आगामी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढावी अशी मागणी होत आहे. खासकरून भाजपचे कार्यकर्ते स्वबळावर लढावे या विचाराचे आहेत. असे असले तरी महायुती एकत्रितच लढणार असून विदर्भात महायुतीची संयुक्त सभा 1 सप्टेंबरला घेण्याचे निश्चित झाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) झालेल्या चुका टाळण्याचे निर्देश भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे. याकरिता विभागवार बैठका घेण्यात येत आहे. विधानसभेत काय काय करायचे यादी प्रमुख पदाधिकार्यांना यापूर्वी देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नेत्यांची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. आत एक सप्टेंबरला संयुक्त सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याचे ठरवण्यात आले आहे. तत्पूर्वी शहर व गावोगावी संवाद यात्रा (Sanvad Yatra) काढून छोटेखानी सभा घेण्यात येणार आहे. या सभेत मतदारांशी संवाद साधून योजनेबद्दलचे वचन देण्याचा निर्णय तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार मनिषा कायंदे, आमदार कृपाल तुमाने, नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार योगेश टिळेकर, आमदार परिणय फुके, आमदार रामदास आंबटकर, मोहन मते, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार, अनिल अहिरकर, श्रीकांत शिवणकर, शिंदे गटाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हाप्रमुख सूरज गोजे, मंगेश काशीकर यांच्यासह महायुतीतील भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळातील महायुतीच्या राजकीय घडामोडीवर चर्चा झाली. विशेषत: लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या विरोधकांनी केलेल्या खोटे आरोप खोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लाडकी बहीण योजनांबद्दल विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या संभ्रमाची सत्यताही संवाद यात्रेतून मतदारांपर्यंत सांगितली जाणार आहे. दरम्यान, या बैठकीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपाइंच्या गटांना बोलवण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. महायुतीतील निवडणूक चिन्ह असलेल्या प्रमुख तीन पक्षांचेच प्रतिनिधी हजर होते. रिपाई आठवले हा देखील महायुतीचा भाग आहे. मात्र, या पक्षाला बैठकीचे निमंत्रण नव्हते. याबद्दल शहराध्यक्ष विनोद थुल यांनी नाराजी व्यक्त केली.