Nagpur News, 05 Nov : विदर्भातील अकराही जिल्ह्यांमधील १०९ नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकीतून विदर्भातील शहरी क्षेत्रांवर कोणाचा राजकीय प्रभाव आहे, याचा निर्णय लागणार आहे.
गेल्या दीड वर्षात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुती व महाआघाडी यांच्यासाठी वेगवेगळे जनादेश आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ खासदारांपैकी सात खासदार महाआघाडीचे निवडून आले होते, तर महायुतीचे केवळ दोनच खासदार निवडून आणता आले.
मात्र त्यानंतर सात महिन्यांत झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत चित्र एकदम बदलले व विदर्भाने युतीच्या बाजूने कौल दिला. ६२ जागांपैकी ५० जागा जिंकून महायुतीने निर्विवाद प्रभाव विदर्भात दाखवला होता. महाआघाडीला केवळ १२ जागा जिंकता आल्या. या दोन निवडणुकांमधील टोकाच्या विरोधी जनादेशामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या कौलाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
विदर्भातील राजकीय प्रभावाचा विचार केल्यास भाजप व काँग्रेस या दोन पक्षांचाच अधिक प्रभाव आहे. शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट काही नेत्यांची प्रभावक्षेत्रे सोडल्यास राजकीयदृष्ट्या निष्प्रभावी आहेत. त्यातही भाजप केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे या निवडणुकीत लक्ष राहणार आहेत. भाजपाच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने विदर्भात आहे.
नितीन गडकरी यांच्यासारखा दिग्गज नेता केंद्रात मंत्री आहे. पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा विदर्भातील आहे. त्यासोबतच सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांचेही नेतृत्व विदर्भस्तरावर मान्य आहे. या साऱ्या नेत्यांचा प्रभाव या निवडणुकीच्या निमित्ताने दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिथील वाटलेली भाजपची संघटनात्मक रचना विधानसभा निवडणुकीत मात्र जोमाने कार्यरत झाली होती.
तो जोम व उत्साह अजून कायम आहे का, याचीही चाचपणी यानिमित्ताने होणार आहे. दुसरा प्रभावी पक्ष राष्ट्रीय काँग्रेस हाच आहे. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र आता तो ढासळला असून त्याची जागा भाजपने घेतली आहे. परिणामी पक्षाच्या संघटनात्मक शक्तीलाही हादरे बसले आहे. असे असले तरीही गावखेड्यापर्यंत कार्यकर्त्यांची उपस्थिती असणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख अजूनही कायम आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आहे. सध्या हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी ज्यांच्याकडून या पदाची सूत्रे घेतलीत, ते नाना पटोलेही विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासारखे विदर्भात सर्वमान्य असलेले आक्रमक नेते काँग्रेसजवळ आहेत. ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. या निवडणुकीत या नेत्यांच्या नेतृत्वाचीही परीक्षा होणार आहे.
शिवसेनेचे दोन गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट अशा चारही पक्षांचा प्रभाव विदर्भात सर्वत्र नाही. या पक्षांचे नेते ज्या ज्या क्षेत्रात प्रभावी आहेत, त्या क्षेत्रापुरताच या पक्षांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे या पक्षांना भाजपा व काँग्रेस या पक्षांचा आधार घेण्याशिवाय तरणोपाय नाही. युतीत भाजपासोबत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा समन्वय कसा राहील, यावरच या शिंदे व अजित पवार या गटांची शक्ती दिसून येईल. हीच स्थिती शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांचीही राहणार आहे. त्यांचे काँग्रेससोबतचे मनोमीलन किती प्रभावी असेल, यावर या दोन पक्षांची कामगिरी अवलंबून राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.