Wardha Lok Sabha Election Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : बापूंच्या वास्तव्यातील मतदार संघ सोडू नका ‘प्लीज’

प्रसन्न जकाते

Wardha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडीतील मित्रपक्षांस सोडल्या जाणार आहे. वर्धा मतदार संघाबाबत या नुसत्या चर्चेने निष्ठावंत काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. मतदार संघात परसलेल्या या चर्चेमुळे काँग्रेस नेते, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी आपली भावना जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्याकडे व्यक्त केली. चांदुरकर यांनी पक्षाध्यक्षांना याबाबत ई-मेल पाठविला आहे.

इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने वर्धेची जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटास सोडण्याचे ठरविले. त्यादृष्टीने तयारीसाठी कामाला लागण्याची पवारांची सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ऐकली. त्यामुळे काँग्रेस नेते, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झालेत.

वर्धा लोकसभा मतदार संघ महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचे तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक घडामोडीचा साक्षीदार आहे. पण आता हा मतदारसंघ आगामी लोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या शरद पवार गटास जाण्याची चर्चा जोरात आहे. असा निर्णय झाल्यास तो अत्यंत चुकीचा ठरेल, असे स्थानिक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा काहीच प्रभाव नाही. मतदारसंघ त्यांना सोडल्यास आघाडीची एक जागा कमीच होणार, असे नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघाची जागा सोडल्यास काँग्रेस-भाजप यांचे लागेबांधे असल्याचा संदेश लोकांना जाणार आहे. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असून त्यांचाच विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसनेच लढावी यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हणणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यामधील 4 व अमरावती जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. सुरुवातीपासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 2019 पासून हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. कमलनयन बजाज यांनी सर्वाधिक तीन टर्म विजय मिळविला. त्यानंतर वसंत साठेही तीन टर्म खासदार होते. रामदास तडस आता दोन टर्म या मतदार संघाचे खासदार आहेत. अलीकडेच या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. लोकसभा मतदार संघातील अनेक विधानसभा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. अशात भाजप आणि काँग्रेस एकमेकांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT