Kripal Tumane, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Kripal Tumane, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Ramtek Lok Sabha : तुमानेंची वाट खडतर; आघाडीची ताकद अन् मतदारसंघाचा इतिहासही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार...?

Atul Mehere

Ramtek Lok Sabha Constituency News : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा आहे. देशाचे पंतप्रधान राहिलेले पी. व्ही. नरसिंह राव हे याच मतदार संघातून १९८४ आणि १९८९, असे दोन वेळा खासदार झाले होते. सध्या हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कृपाल तुमाने (Kripal Tumane) खासदार आहेत. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पण राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे ते हॅट्ट्रिक साधणार का हे सांगणे सध्यातरी अवघड आहे.

रामटेकने यापूर्वी अनेकांना धडा शिकवला आहे. सुबोध मोहिते शिवसेनेचे खासदार होते. नंतर नारायण राणे यांच्यासोबत ते कॉंग्रेसमध्ये (Congress) गेले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत रामटेकच्या मतदारांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर त्यांचे भाग्य काही फळफळले नाही. सध्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ १५ वर्षांपूर्वी खुला होता. शिवसेनेचे (Shivsena) सुबोध मोहिते निवडून आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. त्यानंतर शिवसेनेत त्यांचे खटकले आणि राजीनामा दिला. नारायण राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये गेले.

सुबोध मोहिते राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पराभूत झाले. नंतर दोन वर्षांसाठी शिवसेनेचे प्रकाश जाधव खासदार झाले. मोहितेंनी गद्दारी केल्यानंतर मतदारसंघ शिवसेनेच्या बाजूने झुकला. त्यानंतर पुनर्रचनेमध्ये रामटेक अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि समीकरणे बदलली. कॉंग्रेसने महासचिव मुकुल वासनिकांना (Mukul Wasnik) रामटेकममध्ये पाठवले. तेव्हा वासनिकांसोबत असलेले युवक कॉंग्रेसचे सर्व स्थानिक नेते शिवसेनेत गेले.

वासनिकांचे सहकारी शिवसेनेत गेले तरी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध होते. याचा फायदा घेत वासनिकांनी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांना गळ घालून रामटेकसाठी कमजोर उमेदवाराचा शोध घेतला. तेव्हा कृपाल तुमाने (विद्यमान खासदार) कॉंग्रेसच्या सेवादलात कार्यरत होते. तुमानेंना शिवसेनेने उमेदवारी दिली. कॉंग्रेसला वाटले की २००९ ची निवडणूक एकतर्फी होईल आणि वासनिक सहज निवडून येईल. पण शिवसेनेला मतदारांनी चांगली साथ दिली.

मतदारांनी शिवसेनेला पसंती तर दिली. परंतु नियोजनाचा अभाव आणि शिवसेनेच्या नेत्यांचा वासनिकांना असलेला छुपा पाठिंबा, यामुळे १६ हजार मतांनी वासनिक निवडून आले. ते खासदार झाले, केंद्रात मंत्रीही झाले. मग ते रामटेककडे कधी फिरकलेच नाही. मात्र, तुमाने ते पाच वर्ष सतत मतदारसंघात फिरत राहिले, काम करीत राहिले. २०१४ च्या निवडणुकीत तुमानेंनी वचपा काढला. वासनिकांचा पराभव केला. तेव्हाच कॉंग्रेसच्या एका बलाढ्य नेत्याने 'पुन्हा इकडे फिरकू नका', असा दम वासनिकांना भरला होता.

२०१९ मध्ये वासनिकांनी पुन्हा लढण्याची हिंमत दाखवली नाही. तेव्हा वेळेवर बीएसपीतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले किशोर गजभीये यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या पाठीशी एकही कॉंग्रेसचा नेता उभा राहिला नाही. त्यामुळे कृपाल तुमाने दुसऱ्यांना आरामात निवडून आले. भाजप आणि शिवसेनेच्या (मूळ शिवसेना) युतीमुळे २०१४ आणि २०१९ दोन्ही वेळा हे शक्य झाले. मात्र, आता २०२४च्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आहेत.

आता खासदार तुमाने एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेले. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) युती होणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे तुमानेंना हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. वासनिक गेल्यानंतर कॉंग्रेसला रामटेक लोकसभेसाठी एकही माणूस तयार करता आला नाही. तसे प्रयत्नही कुणी केले नाही. गजभिये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रामटेकात फिरकलेच नाही आणि नागपुरात रमले. आता मुकुल वासनिक यांची लढण्याची शक्यता नाही आणि लढले तरी निवडून येण्याची शाश्‍वती नाही.

माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रामटेकमधून लढण्याची तयारी दर्शवली आहे. पण ते सध्या आमदार असलेल्या उत्तर नागपुरातून त्यांना मुलगा कुणाल यांना आमदार करायचे आहे. ही तडजोड कॉंग्रेसने स्वीकारली, तरच त्यांची रामटेकला जाण्याची तयारी आहे. मात्र, कॉंग्रेस तसे करेल, असे वाटत नाही. त्यामुळे सध्यातरी कॉंग्रेसकडे रामटेकसाठी उमेदवार नाही, असेच म्हणावे लागते.

रामटेकमध्ये लढण्यासाठी भाजपकडे बरेच लोक आहेत. उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, वेळ पडल्यास राज्याच्या माजी मंत्री सुलेखा कुंभारेही तयार होतील. शिवसेनेसाठी (एकनाथ शिंदे) भाजप (BJP) ही जागा सोडणार की स्वतःचा उमेदवार देणार, हे वेळेवरच कळेल. युतीचे उमेदवार तुमाने राहिले तर त्यांचे नशीब पुन्हा फळफळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण उद्धव ठाकरे कुणाला सामोरे करतात, यावर सर्व खेळ अवलंबून आहे.

यापूर्वी शिवसेनेला सोडणाऱ्या खासदारांना मतदारांनी धडा शिकवल्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे. २००९ मध्ये सुबोध मोहितेंनी तो अनुभव घेतला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. कृपाल तुमाने सोडले तर फार कुणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाही. उद्धव ठाकरेंकडे जुने शिलेदार माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हाप्रमुख राजू हरणे, माजी जिल्हाप्रमुख आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचे समन्वयक राहिलेले जुनेजाणते सतीश हरडे ही मंडळी आहे. मतदारांनी कृपाल तुमाने यांना धडा शिकवायचा ठरवल्यास या तिघांपैकी कुणीही ताकदीची लढत देईल, असे चित्र आहे.

मात्र, आता महाविकास आघाडी झाल्यामुळे आघाडीचे पारडे जड आहे. येथे सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे आघाडीत पण ही जागा ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. या घडामोडींमुळे तुमाने यांना निवडणूक सोपी असणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT