OBC Andolan Sarkarnama
विदर्भ

OBC Andolan News : जातीनिहाय जनगणनेसाठी सरकारवर दबाव आणणार ; ओबीसी आंदोलनात इशारा

Amol Jaybhaye

Nagpur News : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. याच मागणीचा आधार घेत केंद्र सरकारवर जातीनिहाय जनगणनेसाठी दबाव आणण्यात येईल, अशी ग्वाही काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी दिली आहे. नागपुरातील संविधान चौकात सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलनस्थळाला सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांनी भेट दिली. त्यावेळी चतुर्वेदी बोलत होते.

आंदोलकांशी चर्चेनंतर मुत्तेमवार म्हणाले, ओबीसींना मिळालेल्या संवैधानिक आरक्षणात कोणत्याही दुसऱ्या जातीचा समावेश करण्यात येऊ नये. पाहिजे तर एखाद्या प्रवर्गाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे. केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे विधेयक आणणे आता गरजेचे आहे. ओबीसींच्या ४०० जाती समुहात दुसरा वाटेकरी देण्यात येऊ नये. यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी उभय नेत्यांनी केली.

गेल्या १७ दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात ओबीसी (OBC) समाजाचे आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेला बोलाविल्यानंतर ओबीसी बांधवांनी बेमुदत उपोषण स्थगित करीत साखळी उपोषणाला सुरुवात केली. सोमवारी १७ ओबीसी बांधवांनी उपोषण केले. यात गणेश नाखले, दौलत शास्त्री, तुलाराम गुरपुडे, विनायक खरकाटे, अमेय रोकडे, डॉ. अरुण वराडे, प्रा. रमेश पिसे, सुरेश कोंगे, मिनाक्षी गतफने, वसंत राऊत, हेमंत गावंडे, कल्पना मानकर, अविनाश घागरे, शरद वानखेडे, नाना सातपुते, रुतिका डाफ मसमारे यांचा समावेश होता.

ओबीसी जनजागरण करण्यासाठी शाहीर नागोराव आणि यांच्या संचाने यावेळी विविध कलाकृती सादर केली. क्षत्रीय कासार समाजाचे सुनिल लखेटे आणि दिनेश खमेले यांनी ओबीसींच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सरकारने ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आयोजित बैठकीत मोठ्या संख्येत असलेल्या ओबीसी नेते व लोकप्रतिनिधींशी तीनही नेते चर्चा करणार आहे. या चर्चेदरम्यान सरकारवर मागण्या मान्य करण्यासाठी चौफेर दबाव आणण्याची तयारी ओबीसी समाजातील नेत्यांनी केली आहे.

विरोधी पक्षातून कुणीच नाही

ओबीसी समाजातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलाविलेल्या बैठकीत केवळ सत्ताधारी पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेसमधील (Congress) कोणत्याही नेत्याला चर्चेसाठी बोलाविण्यात आलेले नाही. यावरूनही आता राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री, आमदार अनिल देशमुख यांना याबाबत आधीच नाराजी व्यक्त केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT