Vinod Tawde Sarkarnama
महाराष्ट्र

Vinod Tawde : 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?; तावडेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Vinod Tawde clarifies hotel incident: 'सीसीटीव्ही तपासा, आयोगकडून चौकशी होऊ द्या' असं टीकाकारांना आव्हानही दिलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Virar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र याच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज वसईमध्ये एक मोठी खळबळजनक घटना पाहायला मिळाली. या ठिकाणी एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गाठलं आणि तावडे या ठिकाणी पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केला.

ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. तेथील घटनाक्रमाचे व्हिडिओ मीडियावर आले आणि मग वातावरण अधिकच तापलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून सत्ताधारी भाजपवर (BJP) जोरदार टीका सुरू केली, शिवाय तावडेंच्या अटकेचीही मागणी केली.

यानंतर भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन जारी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली.'

तसेच 'मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.' असंही तावडे यांनी सांगितलं.

याचबरोबर, 'हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी.' असं सांगत विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी भूमिका स्पष्ट केली.

विनोद तावडे प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारला आहे. 'हे पाच कोटी रुपये कोणाच्या SAFE मधून आले आणि जनतेचा पैसा कोणी लुटला,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

त्यावर राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून आव्हान दिले आहे. 'राहुल गांधीजी तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा." कोणतीही माहिती नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे पोरकटपणाचं लक्षणं असंही विनोद तावडे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT