Waris Pathan akshay khanna .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Chhava News : 'छावा'त मुस्लिम अभिनेत्यानं औरंगजेबाची भूमिका केली असती तर...; 'एमआयएम'च्या माजी आमदाराचं खळबळजनक विधान

Waris Pathan Statement On Chhava Cinema : बजरंग दल व अनेक हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबरच नष्ट करावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यावरुन नागपूर शहरात सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. मोर्चाला हिंसक वळण लागून जाळपोळ झाली. विधानसभेतही याप्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राज्यभरात या सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची तर अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांना कपटी औरंगजेबाने कसे हालहाल करुन मारले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्यानंतर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का ? म्हणून वाद पेटला आहे.

या सिनेमात औरंगजेबाची भूमिका केलेल्या अक्षय खन्ना याची माजी आमदार आणि एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण (Waris Pathan) यांनी भेट घेतली. भेटीनंतर पठाण यांनी केलेल्या 'एक्स' पोस्टमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

अभिनेता अक्षय खन्ना सोबतचा फोटो व काही ओळी पठाण यांनी एक्सवर पोस्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय की,"छावा चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका साकारणारे अक्षय खन्ना यांची भेट झाली. तो एक चांगला माणूस आहे. छावा या चित्रपटात जर एखाद्या मुस्लिम अभिनेत्याने ही भूमिका केली असती तर आत्तापर्यंत काय झालं असतं?' असा सवाल पठाण यांनी केला आहे. हीच पोस्ट पठाण यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरही मराठी भाषेत पोस्ट केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास चर्चेत आला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना याने क्रुर औरंगजेबाच्या साकारलेल्या भूमिकेवरुन चित्रपट प्रदर्शित सुरु झाल्यापासून चर्चा सुरु झाली. औरंगजेबाबद्दल हिंदूचा मोठा राग बाहेर पडला. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.

बजरंग दल व अनेक हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबरच नष्ट करावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यावरुन नागपूर शहरात सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. मोर्चाला हिंसक वळण लागून जाळपोळ झाली. विधानसभेतही याप्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. चित्रपटावर टीका करायची नाही पण, औरंगजेबाबद्दल राग येत असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं.

त्यातच आता वारीस पठाण यांनी अक्षय खन्ना यांच्या भेटीनंतर उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पठाण यांना नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल नेटकरी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT