Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jaranage: जो मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही, तो विरोधक समजला जाईल; जरांगे पाटलांनी दिला इशारा

Sachin Waghmare

Jalna News : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या अधिवेशनात आमदारांनी मराठा समाजाची मागणी आहे, त्याची मागणी करावी. जर तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही तर तुम्ही समाजाचे विरोधक समजले जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले असून, पहिल्या सत्रात सगेसोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय घ्यावा. सगळे आमदार आणि सगळ्या मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा, ही सरकार आणि सगळ्या आमदारांना मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून केले आहे.

लढा थांबणार कधी?

ज्यांच्या नोंदी नाहीत. त्यांना लाभ द्यायचं सरकारने ठरवलं आहे. त्यावरच सरकार 4 महिने काम करत आहे. त्यामुळे आमच्या व्याख्येसह सरकारने अंमलबजावणी करावी. त्या आधारावर नोंद न मिळालेल्या एका बांधवाचे सर्टिफिकेट बघू आणि मग आंदोलन थांबवू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सगळ्या पक्षांनी 6 महिन्यांपूर्वीच ठराव घेतला होता की, सरकारला वेळ द्यावा. त्यानंतर 7 महिने वेळ दिला. आमची मागणी ही आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगे सोयरेच्या माध्यमातून आरक्षण दिले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्याकडे सगळ्या आमदार, मंत्र्यांनी उद्या पहिल्याच सत्रात हा विषय पटलावर घ्यावा, ही मागणी करा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेगळी मागणी न करता मराठा समाजाची जी मागणी आहे. त्या बाजूने बोलावं ही विनंती, अन्यथा तुम्ही मराठा विरोधी आहेत हे लक्षात येईल. आपली लेकरं स्वतःच्या हाताने मारणं आता बंद करा. आपलं दैवत मराठा समाज आहे. उद्यापासून जो आपल्या बाजूने बोलणार नाही तो आपला विरोधक आहे, असे समजायचे असेही म्हणाले.

आपल्याला आमदार, मंत्री यांचा फोन नाही...

मीडियाचा बांधव हाच आमचा फोन आहे. तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतो. आपल्याला आमदार, मंत्री यांचा फोन आला नाही. आता कोणाला लक्षात नाही, राहिले तर उद्या सकाळी पुन्हा आठवण करून देतो, असेही या वेळी जरांगे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

R

SCROLL FOR NEXT