Mumbai News : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वेगवान घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाची गडबड सुरू आहे. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत एक प्रकारे भाजपला तगडा मेसेज दिला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेत अल्पसंख्याक बाणा कायम ठेवला आहे. त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत (BJP) युती केली असली तरी कायम त्यांनी अल्पसंख्याक बाणा कायम जपला आहे. अजितदादांनी भाजपसोबत जाऊनही अल्पसंख्यांक समाजाला जवळ ठेवलं होतं. याचं उदाहरण म्हणजे नवाब मलिक. भाजपने नवाब मलिक यांना बाजूला ठेवण्यास सांगितले होते. पण अजितदादांनी मलिक यांच्यावर कायम विश्वास ठेवला.
विधानसभेला नवाब मलिक आणि सना मलिक यांना उमेदवारी दिली. यातील सना मलिक निवडून आल्या. अजितदादांनी भाजपसोबत गेल्यानंतरही अल्पसंख्यांक समाजासोबतची जवळीकता कायम ठेवली होती. मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही मलिक यांना बाजूला ठेवा तरच युती होईल, असे म्हटले होते. त्यानंतर अजितदादांनी मलिक यांना लांब केले नाही, भाजपसोबत युती न करता मुंबई महापालिका लढले होते.
त्यानंतर आताही झिशान यांना उमेदवारी देऊन अजित पवार नसले तरी मी त्यांचीच विचारधारा पुढे चालवणार असा मेसेज सुनेत्रा पवार यांनी दिल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्या कोट्यातील एकमेव जागेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत एक प्रकारे भाजपला तगडा मेसेज दिला आहे.
अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपच्या म्हणेल तसे वागेल असे म्हंटले होते. पण झिशान यांच्यारुपाने सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक बाणा कायम ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसोबत काम करीत असताना सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी दिली असून येत्या काळातही अजित पवार यांचा पक्ष त्यांच्या सॊबत असा राहील असा संदेश यातून त्यांनी दिला आहे.