Amey Khopkar - Sushma Andhare  Sarkarnama
मुंबई

MNS Vs Shivsena UBT : '' राज्यात दुष्काळसदृश स्थिती अन् नेत्यांना...'' ; 'इंडिया'च्या 'मेन्यू'वरुन मनसे - ठाकरे गटात 'ट्विटर वॉर' पेटलं !

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक आज आणि उद्या मुंबईत होत आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते त्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी जेवणाला खास पारंपरिक मराठी बेत ठेवण्यात आला आहे. मात्र, आता इंडिया आघाडीच्या बैठकीतील 'साग्रसंगीत' मेन्यूवरुन मनसे ठाकरे गटात 'ट्विटर वॉर'भडकलं आहे.

`मनसे`चे सरचिटणीस आणि चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष नेते अमेय खोपकर यांनी गुरुवारी ट्विट करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, `मविआ`चे नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.A आघाडी बैठकीत मात्र, राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही, अशी सडकून टीका केली आहे.

मनसेच्या या टीकेवर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसा पलटवार केला आहे. `इंडिया`च्या बैठकीमुळे भाजप पक्ष कमालीचा अस्वस्थ झाला असल्याने त्यांनी आपल्या सुपारीबाज लोकांना कामाला लावलं जात आहे. त्यांचं अतार्किक ट्विट आणि स्टेटमेंट देणं सुरु झालंय असं त्या म्हणाल्या आहेत.

खोपकर नेमकं काय म्हणाले....?

इंडियाच्या नेत्यांना नाश्त्यासाठी बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव देण्यात येणार आहे.तर,नारळाची करंजी, दुधी मावा, मोदक. श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची भाजी, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ असा जेवणासाठी बेत आहे.त्यावर इंडियाच्या बैठकीत पंचपक्वान्नाच्या पंगती उठविणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना लाज वाटत नाही का?, अशी विचारणा `मनसे`चे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे.

`मविआ` नेत्यांची राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आणि दुसरीकडे...

राज्यात तीन आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. `मविआ` नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे( I.N.D.I.A)आघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वन्नाच्या पंगती उठतायत,शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. अशी सडकून टीका केली आहे.

... तेव्हा हे सुपारीबाज पुढे आले नाहीत,अंधारेंचा पलटवार

मनसे नेते अमेय खोपकर(Amey Khopkar) यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी ही बाष्कळ बडबड असल्याचे म्हणत जोरदार प्रत्युत्तर लगेच ट्विटरवरच व्हिडीओच्या माध्यमातून दिले. 'इंडिया'च्या बैठकीमुळे भाजप पक्ष कमालीचा अस्वस्थ झाला असल्याने त्यांनी आपल्या सुपारीबाज लोकांना कामाला लावलं जात आहे. ते अतार्किक ट्विट आणि स्टेटमेंट देणं सुरु झालंय अशी बोचरी टीका केली आहे.

पण,त्यांना विसर पडतोय का समृद्धी महामार्गावर २७ लोकांचे जीव गेले. त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार होत असताना भाजप एक पक्ष फोडत होता. तेव्हा नैतिकतेच्या, महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ट्विट करण्यासाठी हे सुपारीबाज पुढे आले नाहीत,याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे त्यांच्या आजच्या बडबडीला अर्थ उरत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT