Vasai Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कारनाम्यावरून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
"आज चड्डी-बनियान गँग तयार झाली आहे. यांचे आमदार-मंत्री मर्सिडीजमध्ये बसतात, हुक्का-सिगारेट पितात. भाजप महायुती सरकार म्हणजे, निवडणूक आयोगाने निवडलेले सरकार आहे", असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.
शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वसई आणि जूचंद्र इथं शाखा उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांनी मुंबईतील रस्त्यांवरून राज्यातील भाजप महायुती सरकारवर टीकास्त्र डागले.
रस्त्यांची दुरवस्था, सरकारच्या कथित फसवणुकीच्या योजना, संविधानाच्या सुरक्षेचा मुद्दा, तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेची बांधिलकी या सर्व मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, "लोक चंद्रावर पोहोचले; पण मुंबईहून वसईला येताना किती वेळ लागतो, याचा विचार करा. आज मुंबईचे रस्ते म्हणजे खड्ड्यांचा नकाशा झाला आहे". एक किलोमीटर गाडी नीट चालू शकत नाही, या महामार्गांचा लाडका कंत्राटदार कोण, असा सवाल करत ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारवर टीका केली.
नायगाव पूर्व जूचंद्र इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचंही उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. शिवसेना नेते विनोद घोसाळकर, वसई-विरार जिल्हाप्रमुख प्रवीण महाप्रलकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड व मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘आज चड्डी-बनियान गँग तयार झाली आहे. यांचे आमदार-मंत्री मर्सिडीजमध्ये बसतात, हुक्का-सिगारेट पितात". शिवसैनिक रस्त्यावर जनतेसोबत असतो, शाखा म्हणजे आमचे न्यायमंदिर आहे, जिथे कोर्ट नाही, पोलिस नाही तिथे शाखा आहे. शिवसेनेचा 60 वर्षांचा वारसा ही न्याय देण्याची परंपरा आहे, असेही आदित्य यांनी म्हटले.
'सध्याचे सरकार जनतेचे नाही, तर निवडणूक आयोगाने निवडले आहे, लोकशाही वाचवायची असेल तर शिवसेनेलाच सत्तेत आणा, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले. आज संविधानच धोक्यात आहे. भाजपचे खासदार संविधानविरोधी वक्तव्य करतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, जनसुरक्षा हा कायदा जनतेच्या नव्हे, तर सत्तेच्या सुरक्षेसाठी भाजपने आणला आहे', असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
सरकारने धारावीची 300 एकर जमीन आणि मुंबईतील 1,600 एकर जमीन पुनर्विकासाच्या नावाखाली अदाणींच्या घशात घालण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भाजप महायुती सरकार भांडवलदारांसाठी काम करत आहे. महाराष्ट्र अन् मुंबई वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत मराठी माणसानं जागल्याच्या भूमिकेत घेण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.