Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi Meeting : निमंत्रणानंतरही ‘वंचित’ची महाआघाडीच्या बैठकीस दांडी; आंबेडकरांच्या मनात तरी काय?

Jui Jadhav

Mumbai News : महाविकास आघाडीतील घटक पक्षांची (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीतर्फे इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला जागा देण्याची तयारी आहे. मात्र, काँग्रेस आणि ‘वंचित’मधील वाद हे काही केल्या संपताना दिसून येत नाही. निमंत्रण असूनही आंबेडकर आजच्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नेमकं काय चालू आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Absence of 'Vanchit' from Mahavikas Aghadi meeting despite invitation)

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. लोकसभा जागा वाटपासंदर्भातली ही शेवटची बैठक मानली जात आहे. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून कोणीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी ‘वंचित’ला आजच्या बैठकीसाठी आमंत्रित केल्याचं दिसून येतंय. मविआ नेत्यांकडून हे आमंत्रण प्रकाश आंबेडकरांना दिलं गेलं होतं. या पत्रावर नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सह्या आहेत. मात्र, यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्यावर जहरी टीका केली आहे. (Mahavikas Aghadi Meeting )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पटोलेंच्या मेंदूत लोचा झालाय : आंबेडकरांची जहरी टीका

नाना पटोले यांच्या मेंदूत लोचा झाला आहे, अशी टिपण्णी करत आंबेडकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून त्यांची भावना व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, महाविकास आघाडीत ‘वंचित’ला निवडणुका जाहीर झाल्यावर समाविष्ट करून घेऊ. त्यावेळी नाना पटोले तिथे हजर होते, मग आज त्यांच्या सहीचं पत्र कसं आलं. याचा अर्थ नाना पटोले यांच्या मेंदूत लोचा झाला आहे, हे स्पष्ट होतं, असं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी लिहिलं आहे.

मविआ बैठक सफल होणार का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण उपस्थित होते.

जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय घडलं? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मविआतील कोणता पक्ष किती जागा लढवणार यासह मतदारसंघनिहाय चर्चा झाली.

उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांना, तर राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राजू शेट्टींना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्यामुळे आज होणाऱ्या महाराष्ट्रातील बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT