Aaditya Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी 'बदलापूर एन्काऊंटर' प्रकरणी सरकारला धारेवर धरले; म्हणाले, 'ह्या घटनेचा वापर...'

Deepak Kulkarni

Badlapur Case News : बदलापूरमध्ये गेल्या महिन्यात दोन चिमुरडींवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती.या घटनेचे तीव्र पडसाद बदलापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

मात्र, या एन्काऊंटवरुन राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवतानाच दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईवरही शंका व्यक्त केली जात आहे.

आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या कारवाईवर ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ते ट्विटमध्ये म्हणतात,बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद असल्याचं ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच ह्या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील असा हल्लाबोलही युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर केला आहे.

पण ह्या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि ह्या लपवालपवीचा काही संबंध आहे का? ह्याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंब्रा बायपास या ठिकाणी सोमवारी(ता.23) संध्याकाळी पोलिस आणि अक्षय यांच्यात झटापट झाली. यामध्ये अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर तीन राऊंड फायर केले. यात एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या फायरिंगमध्ये अक्षयचा मृत्यू झाला. ही घटना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली आहे.

शरद पवारांचं ट्विट...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.पवार ट्विटमध्ये म्हणतात, बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती.

परंतू,या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT