Mumbai, 04 March : संतोष देशमुख खून प्रकरणी सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण पहिल्या दिवसापासून लावून धरलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी नवी मागणी केली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना एक वर्षाच्या आतमध्ये फाशी व्हावी, अशी अपेक्षा धस यांनी व्यक्त केली आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतल्यामुळे मी संपूर्ण बीड जिल्हा, मस्साजोग आणि देशमुख परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. ही घटना मी पहिल्यांदा १६ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभेत मांडली होती. त्यावेळी मला काही लोकांनी हे जादा होत आहे, असे म्हटले होते. या प्रकरणी चार्जशीट दाखल झाले आणि या प्रकरणातील फोटो बाहेर आल्यानंतर ही घटना किती वेदनादायी आहे, हे सर्वांसमोर आले.
संतोष देशमुख यांना एवढ्या क्रूरपणे मारले आहे, त्यामुळे या सर्व लोकांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत, त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही घटना झालेली नाही. या प्रकरणातील जे तरुण आहेत, त्यांना वाटत होतं की विष्णू चाटे हा आमचा बॉस आहे आणि आका आमचा बाप आहे, असेही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस म्हणाले, वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा बाप झाला होता. संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले म्हणत होता की, ‘मी तुझा बाप आहे,’ असं म्हण. नाही तर मी पुन्हा मारेन. या सर्वांचे आका हे धनंजय मुंडे होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे मी मनापासून आभार मानतो, या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
संतोष देशमुख खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, ही चांगली गोष्ट आहे. पण, या प्रकरणात त्यांची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीने याप्रकरणी जे चार्जशीट दाखल केले आहे, त्यात पुरवणी जोडणार असल्याचे म्हटले आहे, असा दावाही सुरेश धस यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात जे जे सामील आहेत, ज्यांनी ज्यांनी त्यांना मारलं आहे. त्या सर्वांना एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायायलयात चालविण्यात यावा आणि हे प्रकरण फाशीच्या शिक्षेसाठी एका वर्षात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि यातील सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.