Praful Patel, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar and Praful Patel : 'देवगिरी'वर अजित पवार, प्रफुल्ल पटेलांचे चिंतनमंथन

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांभी उभे केलेल्या 10 पैकी 6 जण खासदार होणार असल्याचे एक्झिट पोलने दाखवून दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या दोन-अडीच तासांतील कलही पवारसाहेबांच्या बाजूने दिसत आहेत.

अर्थात, अजितदादांच्या पक्षाने लढवलेल्या चारपैकी एका जागेवरही या आघाडी दिसत नाही. साहजिकच अजितदादांसह या पक्षातील बडे नेते, आणि नऊ मंत्रीही बुचकळ्यात पडले आहेत. या निकालाचे आकडे पुढे येत असतानाच अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात मुंबईत देवगिरी बंगल्यात बैठक सुरू आहे. निकालादरम्यानच ही बैठक होत असल्याने तिला प्रचंड महत्त्व आले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, त्यानंतर ते मीडियापुढे येणार का, याकडे लक्ष राहणार आहे.

ज्यांचे बोट धरून राजाकरणात प्रवेश केला त्या शरद पवारांची साथ सोडणे, 40 आमदार सोबत घेऊन सरकारमध्ये सहभागी होणे, इतके सारे करूनही आपल्या हाती काय लागले, असा प्रश्न आता अजितदादा पवार यांना पडला असेल. त्याचीच चर्चा मुंबईतील बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांना सोडणे, त्यांच्या वर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करणे, याची किंमत अजितदादा पवार यांना या निवडणुकीत मोजावी लागली आहे. अजितदादांचे सख्खे भाऊ, पुतणेही त्यांच्यासोबत उभे राहिले नाहीत. यावरून बारामतीकरांचा मूड काय आहे, हे दादांच्या लक्षात आधीच आलेले असणार. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क झाले. पालकमंत्री पदांच्या वाटपात अजितदादांना झुकते माप मिळाले, त्यावेळी तर शिंदे यांचे कान टवकारले गेले असतील. त्यानंतर शिंदे सावध झाले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सुरुवातीला शिंदे यांना नमते घ्यायला भाजपने भाग पाडले, मात्र नंतर त्यांनी खंबीर भूमिका घेत 15 जागा पदरात पाडून घेतल्या. नाशिकची जागाही त्यांनी अशाचप्रकारे पदरात पाडून घेतली. हिंगोलीत त्यांना उमेदवार बदलावा लागला होता. यवतमाळच्या पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांना तिकीट नाकारावे लागले होते. यामागे भाजपचा दबाव होता.

अजितदादांचे असे अस्तित्व सरकारमध्ये आणि लोकसभेच्या जागावाटपातही दिसून आले नाही. परभणीत अजितदादांचे नेते राजेश विटेकर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना तगडी लढत दिली होती. यावेळी विटेकर निवडून येऊ शकले असते, मात्र दादांनी ती जागा भाजपला सोडून दिली आणि उस्मानबादची जागा घेतली. उस्मानाबादची जागा घेतली तरी त्यांना तेथे उमेदवार मिळाला नाही. त्यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती, मात्र त्यांना उमेदवारी न देता दादांनी उमेदवार आयात केला. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. अशा तऱ्हेने एक धड ना भाराभर चिंध्या अशी अवस्था अजितदादांनी करून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT